मानसी नाईक ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच मानसी उत्तम डान्सर आहे. मध्यंतरी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. प्रेम, लग्न, घटस्फोट या संपूर्ण प्रक्रियेचा तिने कसा सामना केला? आणि या अडचणींच्या काळात अभिनेत्रीचे दोन अपघात झाले, यातून ती कशी सावरली याबाबत मानसीने भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पामस्ती पॉडकास्ट’मध्ये खुलासा केला आहे.
मानसीचे परळीहून घरी जाताना आणि महामार्गावर रात्रीच्या वेळी कारमधून प्रवास करताना असे दोन अपघात झाले. यानंतर अभिनेत्रीने आयुष्यात काही नियम ठरवले याविषयी सांगताना ती म्हणाली, “माझा पुनर्जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण, महामार्गावरील अपघात फारच भीषण होता, तेव्हा माझी संपूर्ण टीम माझ्याबरोबर होती. माझ्या डोळ्याला दुखापत झाली होती. मी डोळे बंद करून बसले होते ही खरंच स्वामींची कृपा आहे. यानंतर रात्रीचा प्रवास करायचा नाही हा नियम मी स्वत:साठी ठरवला. रात्री प्रवास करताना आमच्या चालकाला झोप लागली आणि आमची गाडी ट्रकमध्ये घुसली… त्या चालकाला काही झाले नाही परंतु, त्याच्या बाजूला बसलेल्या माझ्या सुरक्षारक्षकाला गंभीर दुखापत झाली…आता रात्रीचा प्रवास अजिबात करणार नाही.”
मानसी पुढे म्हणाली, “अपघात झाल्यावर आम्हाला महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड सहकार्य केले. या गोष्टी अजिबात मीडियापर्यंत गेल्या नाहीत. आमची पूर्ण गाडी ट्रकमध्ये घुसली होती…आधीचा अपघात सुद्धा असाच झाला होता. पण, आता यापुढे काही झाले तरी रात्रीचा प्रवास करणार नाही. या सगळ्यात माझा देवावर असलेला विश्वास आणखी दृढ झाला.”
हेही वाचा : “मला एका मोठ्या दिग्दर्शकाने…”, मानसी नाईकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “टाईमपास म्हणून…”
“आयुष्यात आलेल्या या कठीण काळानंतर देवावरचा विश्वास अधिक वाढला. गणपती बाप्पा, आई तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ या देवांना मी खूप मानते. त्यांच्यामुळे मला बळ मिळालंय आणि एवढ्या गोष्टी घडून गेल्यावरही मी आज या समाजात ताठ मानेने फक्त वावरत आहे. ही फक्त देवाची कृपा आहे. आता प्रत्येक गोष्ट करताना मी दोनवेळा विचार करते. आधीपेक्षा मी प्रचंड शांत झाले आहे…आता मी स्वत:ला जास्त वेळ देते आणि यापुढे कायम देत राहीन.” असे मानसीने सांगितले.