रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. शनिवारी, २९ जूनला बार्बाडोसमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करून टी-२०चं जगज्जेतेपद मिळवलं. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. कारण आफ्रिकेनं सामन्यावर वर्चस्व मिळवलं होतं. भारतीय संघ जिंकणार की नाही? अशी हूरहूर भारतीय क्रिकेटप्रेमींना सामन्याच्या शेवटपर्यंत होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष जगभरातील भारतीय करताना दिसत आहेत.

टी-२० विश्वचषक २०२४मध्ये विजयाचं श्रेय जितकं भारतीय संघातील क्रिकेटर्सना आहे, तितकंच प्रशिक्षक राहुल द्रविडचंही आहे. त्यामुळे भारतीय संघासह राहुल द्रविडच्या चिकाटीचं देखील कौतुक केलं जात आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनने राहुल द्रविडसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – राहुल द्रविडची पुतणी आहे मराठमोळी अभिनेत्री! भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर अदितीची भावुक पोस्ट

क्षितिजने राहुल द्रविडचा दोन फोटो कोलाज केलेला एक फोटो शेअर केलेला आहे. पहिला फोटो हा २००७मधील विश्वचषक स्पर्धेचा असून यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता. २००७मधील पराभवामुळे राहुल कर्णधारपद सोडावं लागलं होतं. दुसरा फोटो हा शनिवारी भारतीय संघ विजयी झाल्यानंतरच्या राहुलच्या रिअ‍ॅक्शनचा आहे.

हा कोलाज फोटो शेअर करत क्षितिजने लिहिलं आहे, “व्यथेची दंतकथा व्हायला सर्वस्व द्यावं लागतं. राहुल द्रविड. काळाच्या परीक्षा संपल्या, पण माणसाचा अभ्यास नाही संपला. संधी बघता बघता सुटल्या पण माणसाची चिकाटी नाही सुटली. भूमिका वेळोवेळी बदलल्या पण माणसाची निष्ठा नाही बदलली. दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज शिखर म्हणून निवृत्त झाला. राहुल द्रविड. आदर्शांच्या छोट्याश्या यादीत तुझं नाव कायम वर असेल. कायम.”

हेही वाचा – Video: “विराटने किंग कोहली का आहे हे दाखवलं”, सलील कुलकर्णींची टीम इंडियाला शाबासकी, म्हणाले, “पंड्या, बुमराह जादूगार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षितिज पटवर्धनच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे, मेघना एरंडे, स्वप्नील जोशी, आशुतोष गोखले अशा अनेक कलाकारांनी क्षितिजच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “अगदी बरोबर”, “काय लिहिलंय दादा”, “कडक”, “व्वा” अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया या पोस्टवर उमटल्या आहेत..