लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘नटसम्राट’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकतीच त्यांनी बोल भिडू या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे बालपण, शाळेतील आठवणी, अभिनय क्षेत्रात ते का आले, स्मिता पाटील यांच्यामुळे ते सिनेमात आले, त्यांच्या आवडत्या कविता, सिनेमाचा प्रवास अशा अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केले आहे. याचबरोबर आता या टप्प्यावर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काम काय वाटतं, यावरदेखील त्यांनी चर्चा केली आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

‘बोल भिडू’ने घेतलेल्या या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, नट, अभिनेता म्हणून तुम्ही मैलाचा दगड गाठला आहे. आता या टप्प्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम काय वाटतं? त्यावर बोलताना नाना पाटेकर यांनी म्हटले, “आता ही सामाजिक विसंगती आहे आणि ती आपल्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दूर करता येईला का आपल्याला? तसे विषय हाताळणं आणि मुळात जात व धर्म या आपण घरात पाळायच्या गोष्टी आहेत.

त्यावर त्यांना विचारले गेले की, तुमच्या मते देव म्हणजे काय? त्यावर नाना पाटेकरांनी म्हटले, “देश. माझ्या मते, देव ही संकल्पना देश असेल. माझी माणसं जिवंत असतील, तर मी आहे. मला स्वतंत्र अस्तित्व नाहीच आहे. बाहेरच्या देशात गेल्यानंतर तुला काय विचारतात? तुझं नाव काय आहे? अच्छा! भारतीय? ही आपली ओळख आहे; मग तो कुठल्याही धर्माचा असेल. बाहेरच्या देशात गेल्यावर आपण कसे एकत्र अगदी छान असतो. इथे असल्यावर मग का भांडतो? इथे आमचे पॉलिटिशियन्स आहेत, जे आपल्यामध्ये अभेद्य भिंती बांधत आहेत. ते तुम्ही एकदा ओळखायला शिका.”

“काही काही वेळेला मला असं वाटतं की, आपण नक्षलवादी झालो, तर तुम्ही काय करणार- दोन चार माणसांना मारणार. माणसांना मारून ही वृत्ती संपणार आहे का? तर नाही. मग ती वृत्ती संपवायला हवी. मग त्यासाठी काय करता येईल? तर जितकं जमेल तितकं माझ्याकडे कॅमेरा हे माध्यम आहे. त्याचा मी किती सकारात्मकतेनं विचार करतोय आणि वापर करतो. हे फार छान माध्यम आहे. सोशल मीडियावरचे सगळेच चांगले आहेत, असं नाही. पण, त्यातून तुम्ही खूप काही करून घडवू शकता. त्याचा गैरवापरही चाललेला आहे, तो भाग वेगळा; पण तुम्ही त्यातून खूप काही बदल घडवू शकता. दमून-भागून रात्री घरी गेल्यानंतर तुम्ही मोबाईल पाहत असता. काहीतरी बघताना थांबता आणि त्यामध्ये अडकता.”

याच मुलाखतीत नाना पाटेकरांनी त्यांना संगीत खूप आवडत असल्याचं स्पष्ट केलं. अनेक गायक, संगीतकार यांच्याशी खूप चांगलं नातं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये किशोरीताई, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, रशीद खान अशी ही मंडळी आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाना पाटेकर हे त्यांच्या अनेक भूमिकांसाठी ओळखले जातात. ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.