Vaibhav Mangale Shares Post : सध्या राज्यात हिंदी भाषेवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही भाषा शिकवावी लागणार आहे. त्यामुळे राज्यात पहिलीच्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या सक्तीविरोधात राजकीय वर्तुळातून विरोध केला जात आहे.

सरकारच्या हिंदी भाषेच्या निर्णयावर मराठी कलाकारांनी व्यक्त व्हावं अशी अपेक्षा अनेक चाहते आणि प्रेक्षक व्यक्त करत आहेत आणि कलाकार व्यक्तही होत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील हेमंत ढोमे, अरविंद जगताप, सचिन गोस्वामी, प्रथमेश शिवलकर तसंच समीर चौघुले या कलाकारांनी हिंदी भाषेच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या स्पष्ट भूमिका व्यक्त केल्या आहेत.

अशातच आता अभिनेते वैभव मांगले यांनीसुद्धा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हिंदी भाषेच्या निर्णयाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे वैभव मांगलेंनी आपणच आपल्या भाषेची भीषण अवस्था केली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर या पोस्टमधून त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

वैभव मांगलेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

या पोस्टमध्ये वैभव मांगले असं म्हणतात, “उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही. पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यातसुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली, तर संपलंच सगळं… मातृभाषेची (मुळात आई मराठी बोलत असले तर) भिकारणीची अवस्था होईल.”

यापुढे ते म्हणतात, “आता तर खेडोपाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत. मुंबई-पुणे येथे अनेक शाळांमध्ये मराठी शिकवत नाहीत. मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई-बाबांना धड इंग्रजी येत नाही. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते (शिक्षक तरी किती चांगलं बोलतील) त्यामुळे धड इंग्रहीही नाही आणि धड मराठीही नाही. त्यात वेगवेगळ्या बोलीभाषा, पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका. त्याचा वेगळा ताप.”

यानंतर ते उदाहरण देत असं म्हणतात, “आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणतात. मी उबारलायस म्हणतो; शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. “माझ्या वांगडा चल” म्हणतो, तर शाळेत माझ्याबरोबर चल म्हणा असं सांगतात. हे सगळं त्या बालमनाला संकट वाटतं. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला) जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घराबाहेर गेलीच समजा.”

यानंतर वैभव मांगले नाराजीच्या सुरात असं म्हणतात, “आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे. तिच्याबद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर मलिकेत स्क्रिप्ट (संहिता) सुद्धा मराठीत देत नाहीत (अनेक ठिकाणी) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे वैभव मांगलेंनी “हिंदी पहिलीपासून येईल न येईल हा माझ्यासाठी नंतरचा मुद्दा आहे. कदाचित येणारही नाही; पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का? आपण आपल्या मुलांचं मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का? मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का?” असे काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.