कोणत्याही चित्रपटाचा सीक्वेल म्हणजे पुढील भाग करताना मूळ चित्रपटाशी तुलना होण्याचा अनेकदा संभव असतो. किंबहुना हिंदी सिनेमांचे सीक्वेल पाहिले की मूळ सिनेमा नेहमीच अधिक सरस ठरल्याची उदाहरणे खूप आठवतात. परंतु, सीक्वेल असूनही संपूर्णपणे नवा सिनेमा, जुन्या गोष्टीला पुढे नेणारी पण नवीन गोष्ट आणि नवा विचार, आजच्या तरुणींचा विचार मांडण्याचा प्रयत्न ‘मुंबई पुणे मुंबई २ – लग्नाला यायचंच’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शकाने केला असून तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. किंबहुना सीक्वेल आणूनही मूळ सिनेमा न पाहिलेल्या प्रेक्षकांनाही जुन्या सिनेमाचे सूत्र अगदी थोडक्यात सांगत नव्या सिनेमाचा आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने मांडणी लेखक-दिग्दर्शकांनी केली आहे त्यामुळेही सिनेमा अधिक सरस ठरतो. लग्नसोहळ्याच्या तयारीची धमाल अनुभवण्याबरोबरच समाजातील नवा बदल टिपण्याचा सूक्ष्म प्रयत्न हा चित्रपट करतो.
लग्न या विषयावर हिंदी प्रमाणेच मराठीतही अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनही लग्नसोहळ्याचे चित्रण पुन्हा एकदा पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटू शकते. परंतु, प्रत्यक्ष लग्नसोहळा दाखविण्याऐवजी गौरी आणि गौतम यांचे लग्न ठरल्यानंतर प्रत्यक्ष लग्न होईपर्यंतचा प्रवास दिग्दर्शकाने मांडला आहे. आजच्या सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय आणि करिअरमध्ये यशस्वी असलेल्या तरुणींचे विवाहसंस्थेसंबंधीचे विचार, तिचा जोडीदाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अपेक्षा, नातेसंबंधांच्या बाबतीत निर्माण झालेला गोंधळ किंवा लग्नानंतर मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते हे समाजाने ठसविलेले असल्यामुळे होणारी घालमेल अशा अनेकविध पैलूंवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. मराठी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांची मोकळीढाकळी जीवनशैली दाखवितानाच अनेक बदललेल्या गोष्टींची झलक लेखक-दिग्दर्शकांनी समर्थपणे दाखवली आहे.
गौरी-गौतम यांचे लग्न ठरल्यानंतर दोघांचीही कुटुंबं जोमाने लग्नाच्या तयारीला लागतात. मात्र पूर्वी आवडलेल्या गौतमशी लग्न ठरल्यानंतर झालेल्या भेटीगाठींमध्ये गौरीला गौतम बदलला आहे, आपल्याला गृहित धरू लागला आहे अशी काहीशी भावना गौरीच्या मनात निर्माण होते. त्यातच तिचा मित्र अर्णव तिला भेटून माफी मागतो. कधीही माफी न मागणारा अर्णव आपली माफी मागतो हे पाहून गौरी आश्चर्यचकित होते. गौतम बदललाय अशी धारणा जवळजवळ पक्की होत असतानाच गौरीच्या आयुष्यात पुन्हा अर्णवचा प्रवेश या गोष्टींमुळे गौरी गोंधळात पडते. गौतमशी ठरलेल्या लग्नाचा पुनर्विचार करण्याची गरज तिला वाटू लागते.
मूळ चित्रपटात गौरी-गौतम यांच्या कुटुंबाचे दर्शन घडविलेले नाही. त्यामुळे सीक्वेल असूनही नव्या चित्रपटाप्रमाणेच गौरी-गौतम या दोघांच्याही कुटुंबातील व्यक्तींची ओळख प्रेक्षकांना करून देण्यात आली आहे. हा या चित्रपटातील नवा भाग आहे. लग्न दोन व्यक्तींचे होत असले तरी त्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांचे एकत्र येणे हाही आपल्याकडे अतिशय महत्त्वाचा आणि म्हणून नवरा-नवरींच्या आयुष्यातही महत्त्वाचा ठरणारा भाग असतो.
आजच्या काळात एकीकडे मराठी समाजात सुखवस्तूपणा वाढीस लागलेला असताना, विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या तरुण-तरुणींचे विवाह मोडण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. लग्नसंस्थेबाबतचे आजच्या तरुण-तरुणींचे विचारही बदलत आहेत, बदलले आहेत. या बदलणाऱ्या घटकांचे नेमके प्रतिबिंब या चित्रपटातून लेखक-दिग्दर्शकांनी मांडले आहे हेच या चित्रपटाचे महत्त्वाचे श्रेय म्हणता येईल. कारण असे बदल टिपणे, त्याकडे केवळ अंगुलीनिर्देश करणे कथानकातून गौरीच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रभावी प्रयत्न म्हणूनही लेखक-दिग्दर्शकांना दाद द्यायला हवी.
गौतमने निवडलेली गौरी ही खरोखरीच चांगली मुलगी आहे, समजूतदार आहे, गुणी आहे, गोड आहे, गौतमला आणि आपल्या कुटुंबात सहज सामावून जाईल असे संवादातून प्रेक्षकांना समजते. गौरी गुणी आहे, हुशार आहे. मात्र या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ दिग्दर्शकाने फारसे काही दृश्यांतून दाखविलेले नाही. आजच्या लग्नाळू किंवा त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या तरुणांना गौरी ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहताना ती फक्त गोंधळलेली आहे एवढेच अधिक प्रकर्षांने जाणवेल. त्यामुळे ती गुणी आहे, हुशार आहे, गोड आहे हे जे संवादातून आले आहे त्या विधानांना पूरक अशी गौरीची हुशारी दाखविणारे प्रसंग मात्र चित्रपटात नाहीत. ही एक उणीव सोडली तरी गौरी या भूमिकेद्वारे लग्न ठरलेल्या आजच्या तरुणीची घालमेल, द्विधा किंवा गोंधळलेली मनस्थिती, लग्न ठरल्यानंतर पुढील आयुष्यात जोडीदाराशी जोडून घेऊन सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करण्याची सवय लावून घेणे असे अनेक बारकावे मुक्ता बर्वेने अभिनयातून प्रभावीपणे दाखविले आहेत. आमचं पुणं नेहमीच मुंबईपेक्षा श्रेष्ठ हा आपला खाक्या सोडून देऊन थोडा प्रगल्भ झालेला; परंतु आपला बालिशपणा कायम ठेवत वागणारा गौतम हा नायक स्वप्नील जोशीनेही तितकाच प्रभावी साकारला आहे. अवखळपणा, गुलछबू प्रतिमा जाऊन लग्नाळू तरुण बनल्यानंतरचा थोडासा समजूदारपणा या छटा त्याने अभिनयातून दाखविल्या आहेत.
मुंबई पुणे मुंबई २ लग्नाला यायचंच
निर्माते – मिराह एण्टरटेन्मेंट, एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट
दिग्दर्शक – सतीश राजवाडे
छायालेखक – सुहास गुजराथी
पटकथा-संवाद – अश्विनी शेंडे
संगीत – अविनाश-विश्वजीत
कलावंत – स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, विजय केंकरे, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, नीलिमा भुरके, आसावरी जोशी, श्रुती मराठे, सुहास जोशी व अन्य.