मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी ही किती समृद्ध आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे. चित्रपट, ओटीटी ही सगळी आत्ताची माध्यमं आहेत. त्याआधी केवळ आणि केवळ नाटकानेच या समाजावर गारुड होतं. बालगंधर्व, मास्टर दिनानाथ यांच्यापासून लक्षणराव देशपांडे, भरत जाधव कित्येक रंगकर्मी मंडळींनी मायबाप रासिकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या काही वर्षात जरी मराठी नाटक फारसं चालत नसलं तरी गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ फक्त नाटक करणारा एक हरहुन्नरी आणि खरा रंगकर्मी म्हणजे प्रशांत दामले.

चित्रपट, मालिका, नाटक या तिनही माध्यमात काम केलेल्या प्रशांत दामले यांनी एका काळानंतर केवळ नाटकच करायचं ठरवलं. कारण त्यात त्यांना समाधान मिळत होतं. आजही प्रशांत दामले यांचं नाटक म्हंटलं की मराठी प्रेक्षक हमखास गर्दी करतो. अशाच नाट्यसृष्टीतील दिग्गज माणसाच्या नाटकातून एक कुटुंब नाटक अर्धवट टाकून निघून गेलं आणि त्यांनी प्रशांत दामले यांच्यासाठी एक खास निरोपही ठेवला होता. तोच किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : ट्विटरला रामराम केलेल्या करण जोहरला विवेक अग्निहोत्री यांचा टोला, म्हणाले, “मैदान सोडून पळून जाणारे…”

‘थिंक बँक’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी त्यांचा नाटकातील धमाल, गंमत आणि एक नाट्यनिर्माता म्हणून आलेले अनुभव याविषयी गप्पा मारल्या आहेत. यादरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील एका नाटकादरम्यानचा किस्सा प्रशांत यांनी सांगितला. प्रशांत याचा नाटकाचा शो बालगंधर्वला होता, बरीच गर्दी जमली होती, नाटक जेव्हा संपलं तेव्हा तिकीट तपासणाऱ्या मंडळींनी ४ फाडलेली तिकीटं पुन्हा स्टेपल केलेली प्रशांत दामले यांच्या हातात आणून दिली. ती ४ तिकीटं एका कुटुंबाची होती, तब्बल १६०० रुपये देऊन त्यांनी ती खरेदी केली होती. त्यांना प्रशांत दामले यांचं हे नाटक आवडलं नसल्याने मध्यांतरातच ते कुटुंब तिकीट परत करून निघून गेले होते. त्या टिकीटाच्या मागे त्यांनी प्रशांत यांच्यासाठी एक निरोप लिहिला होता. तो असा की, “दामले हे नाटक तुमच्या लायकीचं नाही. आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला आमच्या तिकिटाचे पैसे परत नकोत, आम्ही मध्यांतरातच नाटक सोडून जात आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६०० रुपयांची ती ४ तिकीटं आणि त्यामागे लिहिलेल्या त्या ओळींनी प्रशांत दामले यांना खूप मोठा धडा शिकवला. ते नाटक तेवढं खास नव्हतं हे खुद्द प्रशांत दामले यांनीही मान्य केलं. पण निर्माता म्हणून त्यांचे त्यात पैसे अडकले असल्याने पुढील काही काळ तरी ते नाटक करणं त्यांना भाग होतं. स्वतः गुंतवलेले पैसे परत मिळाल्यावर मात्र प्रशांत यांनी ते नाटक बंद केलं.