'कॉफी विथ करण'चा आठवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पहिल्याच भागापासून हा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागात दीपिका पदूकोण व रणवीर सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा करताना दीपिकाने केलेलं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही करायला सुरू केलं. आता करण जोहर त्याच्या पुढील भागात कोणाला बोलवणार याची उत्सुकता लागली आहे. अशातच आता करण जोहर पुन्हा त्याच्या मंचावर क्रिकेटर्सना बोलवणार का यावर त्याने उत्तर दिलं आहे. या कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनमध्ये भारतीय संघाचे खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी एकूणच त्या भागात दोघांनी फारच विचित्र अशी वक्तव्य केल्याने तो एपिसोड चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर तो भाग कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमधूनही हटवण्यात आला होता. इतकंच नव्हे तर त्या दोन्ही क्रिकेटर्सवरही कारवाई झाली होती. आणखी वाचा : अर्जुन कपूर व भूमी पेडणेकरची सिझलिंग केमिस्ट्री, जबरदस्त सस्पेन्स अन्… 'द लेडीकिलर'चा ट्रेलर प्रदर्शित शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी करण जोहर इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत होता. यावेळी एका नेटकऱ्याने क्रिकेटर्सना या नव्या सीझनमध्ये बोलवणार का? असा प्रश्न कॉमेंट करत विचारला. त्याला उत्तर देताना करण म्हणाला, "क्रिकेटर्स येऊ शकतील का याबद्दल मला काहीच कल्पना नाही. ते कित्येकांसाठी आदर्श आहेत, अन् मला त्यांच्याबरोबर एखादा एपिसोड करायला आवडेल. पण गेल्यावेळी जो प्रकार झाला त्यानंतर ती मंडळी माझ्याशी फोनवरही बोलतील का याबाबतीत मी साशंक आहे. मला त्यांना फोन करायलाही भीती वाटते. माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आहे आणि मला त्यांचा नकार पचवता येणार नाही." करणच्या चॅट शोमध्ये आल्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. महिलांबद्दल अपमानास्पद भाषेत वक्तव्य केल्याने सगळ्यांनीच त्यांना खडेबोल सुनावले होते. माफी मागितल्यानंतरही या दोघांना भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. क्रिकेटपटूंच्या या परिस्थितीला आपणच कारणीभूत असल्याचं खुद्द करण जोहरनेही कबूल केलं होतं.