Sankarshan Karhade Post : मराठी नाटकांची एक समृद्ध परंपरा आहे. मराठी नाट्यसृष्टीने आजवर अनेक दिग्गज कलाकार आपल्याला दिले. एकीकडे मराठी नाटकांचे गोडवे गायले जात असतानाच ही नाटकं सादर केल्या जाणाऱ्या नाट्यगृहांची अवस्था मात्र फारशी चांगली नाही. एकीकडे मराठी नाटकं मोठी होत आहेत, तर दुसरीकडे मात्र अजूनही अनेक ठिकाणी काही नाट्यगृहे खराब अवस्थेत आहेत. याबद्दल आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही या नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये संकर्षण कऱ्हाडेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विविधांगी भूमिका साकारत तो नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.
संकर्षण सोशल मीडियावर त्याच्या कामाबद्दल तसंच नाटकांबद्दलची माहिती देत असतो. सध्या संकर्षणच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. तसंच या पोस्टमधून त्याने नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये संकर्षण म्हणतो, “परभणीत फक्त पाय ठेवता आले. आजपासून ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाचा मराठवाडा दौरा आहे. आज २३ जून नांदेड, उद्या २४ जून लातूर, २५ जून छ. संभाजीनगर असे प्रयोग आहेत.”
संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे तो म्हणतो, “दुर्दैवाने या यादीत माझं गाव… परभणी नाही… याचं कारण – परभणीतल्या रंगमंदिराची दुरावस्था… इतकं वाईट वाटलं… ज्या परभणीत कलाकृतींची, कलाकारांची परंपरा आहे, तिथे तिथल्याच कलाकाराच्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होऊ शकत नाही. असो, आपलं गाव ते आपलं गाव… प्रेम तितकंच आहे… कधीतरी इथेही प्रयोग होईल अशी आशा आहे;” तर यापुढे संकर्षणने “माझ्या माणसांनो… प्रेक्षकांनो… नाटकाला या…” असं म्हणत चाहत्यांना नाटकाला येण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, २१ मार्च २०२५ रोजी संकर्षणचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या नाटकात संकर्षणसह अमोल कुलकर्णी, तन्वी मुंडले आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका आहेत. रंगभूमीवर या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवाय संकर्षणचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटकही सुरू आहे. त्याचबरोबर संकर्षण स्पृहाबरोबर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.