Seema Ghogale Shared Her Rejection Experience : मनोरंजन क्षेत्र हे अनिश्चित स्वरुपाचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला संघर्षाचा सामना करावा लागतो. या संघर्षाच्या प्रवासात प्रत्येक कलाकाराला कधी ना कधी रिजेक्शनलाही सामोरं जावं लागतं. आजवर अनेक कलाकारांनी त्यांना भूमिकेसाठी मिळालेल्या नकारांबद्दल सांगितलं आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीनेही तिच्या रिजेक्शनबद्दल सांगितलं. ही अभिनेत्री म्हणजे सीमा घोगळे.
‘पिरतीचा वणवा उरी पेटला’साठी करावा लागलेलं रिजेक्शन
‘इंद्रायणी’, ‘आई कुठे काय करते’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’, ’खुलता खळी खुलेना’, ‘एक होती राजकन्या’ अशा मालिकांमधून सीमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सीमाची ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील भूमिका चांगलीच गाजली. याच मालिकेच्या वेळी एका दुसऱ्या मालिकेसाठी सीमाला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. या रिजेक्शनबद्दल तिने राजश्री मराठीशी बोलताना तिच्या भावना व्यक्त केल्या.
नवीन भूमिकेसाठी ‘आई कुठे काय करते’ मालिका सोडली
यावेळी सीमा म्हणाली, “मी ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिका केली. त्या मालिकेसाठी आधी माझं कास्टिंग वगैरे झालं होतं आणि तेव्हाच मी ‘आई कुठे काय करते’ मालिकेचंही शूटिंग करत होते. ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेचं शूटिंग नाशिकमध्ये होतं आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शूटिंग ठाण्यात होतं. तेव्हा माझी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतली भूमिका तशी कमी होती; याउलट ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेत मी हिरोची आई होते.”
मानधन ठरल्यानंतरही भूमिकेसाठी मिळालेला नकार
यानंतर सीमाने म्हटलं, “मी ‘आई कुठे काय करते’ मालिका करणार नाही असं सांगितलं. मग साधारण १५ दिवसांनी मला फोन आला की, तुझं ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेचं कास्टिंगही झालेलं नाही. मानधन वगैरे सगळं ठरलं होतं आणि मला काहीतरी समस्या असल्याचं सांगण्यात आलं. माझ्यासाठी हे पहिलं रिजेक्शन होतं. मग मी माझ्या परीने हे असं का होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला.”
रिजेक्शननंतर पुन्हा त्याच भूमिकेसाठी विचारणा
यापुढे सीमाने म्हटलं, “नंतर माझ्या असं लक्षात आलं की, ‘मी आई कुठे काय करते’ मालिकेत मोलकरणीचं छोटंसं पात्र करत आहे. तर नवीन मालिकेत मी महत्त्वाची भूमिका करू शकेल का? असं त्यांना वाटलं. मग पुन्हा काही दिवसांनी मला फोन आला की, तुम्ही दुसरं काम घेतलं आहे का? त्यावर मी त्यांच्यावर चिडून दुसरं काम कसं घेणार असं म्हटलं. त्यावर समोरून या मालिकेत मलाच घेण्याचा विचार करत असल्याचं ते म्हणाले.”
दिग्दर्शकामुळेच नकार मिळालेली भूमिका मिळाली
पुढे सीमाने सांगितलं की, “पिरतीचा वणवा उरी पेटला मालिकेसाठी विनोद लव्हेकर यांनी कास्टिंग केलं होतं आणि त्यांनीच मी ही भूमिका करेन असं म्हटलं होतं. मग ते सगळं झालं आणि त्यानंतर मी ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ ही मालिका झाली. मी ती माझ्यापरीने केली.” दरम्यान, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेत सीमाने कृष्णाई ही भूमिका केली होती.