Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात काही दिवसांपासून काही सदस्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा देण्यामागचं कारण ‘बिग बॉस’ने स्पष्ट केलं. “आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठी देखील चूल पेटणं शक्य होतं नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा,” असं ‘बिग बॉस’कडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस’चे हे शब्द ऐकून पंढरीनाथ कांबळेचे अश्रू अनावर झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदारने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने पंढरीनाथ कांबळेचा एक किस्सा सांगितला.

अभिनेत्री विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचा भावुक होतानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “आपला पॅडी का रडला? खरं सांगू का…यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिलाय…अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी…पंढरीनाथ.”

हेही वाचा – Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला, “या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”

पुढे तिने लिहिलं, “एक किस्सा आठवला…असंच आम्ही प्रयोगाला जात होतो, रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला. तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळलं की तुमचं ठिकाणी, असं म्हणाली. त्यावर पॅडी म्हणाला की अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे…हसलो…त्यावर तिने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला.. आणि आम्ही थोडं पुढे गेलो…त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली..मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं नाही गाडीत? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं…”

“संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या तिचा नवरा त्यांची मासेमारीची बोट त्यावरचे कामगार सगळं…तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं…तिचं आपलं दर काही वाक्यानंतर चालू होतं “बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले…” कधीच नाही बसले ग गाडीत…नुसत्या गाड्या तोंडासमोरून जायच्या. बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले…ते पण एवढ्या मोठ्या गाडीत…मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडीने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्हीमध्ये ‘शुभविवाह’ दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी…हे सांगितल्यावर तिने ओळखलं…साडीत वेगळ्या दिसता तुम्ही… भूमी आकाश रागिणीवाली सिरीयल…मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तस निरखून पाहिल नाही…असं म्हणाली..आभार वैगरे मागून ती निघून गेली, ” असं विशाखा सुभेदार म्हणाली.

हेही वाचा – “सखीकडे बघून सारखं भरून येत होतं”, लेक आणि जावयाच्या नव्या नाटकावर शुभांगी गोखलेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “दोघांबद्दल आदर वाढला…”

“पॅडी दुसऱ्याच्या सुख-दुःखात साथ देणारा”

शिवाय पुढे म्हणाली, “तिचा आनंद पाहून पॅडीला आनंद होत होता, आपल्या आईला सोडलं असं वाटतं होतं…त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघ ही अबोल .. त्यांनं त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला…असा आहे.. पॅडी! दुसऱ्याच्या सुख-दुःखात साथ देणारा…त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे…थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली की कायमची…त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तस बोलतो आणि गरज पडली तरच…सूरज पहिल्या दिवसापासून बेडवर पॅडीच्या बाजूला झोपला.. त्यावेळी तर त्यांची ओळख ही नव्हती.. हा… आलय? ते पासून त्याची काळजी घेणं त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. तिनं या व्यतिरिक्त मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३), ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. सध्या विशाखा ‘शुभविवाह’ मालिकेत रागिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.