प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी रिअॅलिटी शोमध्ये सतत बदल घडवणं जरूरी असतं. प्रेक्षकांनी आपल्या शोशिवाय कोणता इतर शो पाहू नये असा विचार शोचे प्रत्येक निर्माते करत असतात. त्यामुळे प्रेक्षकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा या रिअॅलिटी शोजमध्ये अनेक बदल केले जातात. गरीबी हा तर रिअॅलिटी शोमधला वाहवा मिळवणारा विषय. त्यामुळे रिअॅलिटी शोमधून अनेकदा फक्त गरीबीच दिसते.
त्यामुळे रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये होत असतात. रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. कोणी याला थेट विरोध करतो, तर कोणी अप्रत्यक्षपणे रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचं म्हणतात. याआधी लुईस टेरेन्स, गीता कपूर, शान सारख्या अनेक कलाकारांनी रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबद्दल त्यांची मतं व्यक्त केली आहेत.
अशातच आता रिअॅलिटी शोचा स्पर्धक म्हणून लोकप्रिय असलेला गायक राहुल वैद्यने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत राहुलने असं म्हटलं, “रिअॅलिटी शो आता एक स्क्रिप्टेड टीव्ही शो झाले आहेत. प्रत्येक रिअॅलिटी शोचा एक ठरलेला पॅटर्न आहे. ज्यात कोणाची तरी लव्हस्टोरी असणार, कोणाची ना कोणाची आई दुसऱ्याच्या घरी काम करत असणार, कोणाचे वडील रिक्षा चालक असणार किंवा कोणाच्या तरी घरी उरलेल्या पिठापासूनच पोळी बनवली जात असणार.”
यापुढे तो म्हणाला, “आता हे असं होत नसतानाही तुम्हाला सांगितलं जाणार की, तुम्ही असंच बोला. पुर्वी हे असं काही होत नव्हतं किंवा मी गरीब आहे म्हणून मला वोट द्या असं म्हटलं जात असतं, तर मग मीपण हे बोललो असतो. पण तेव्हा असं काही नव्हतं. तेव्हा रिअॅलिटी शो खरंच रिअल होते.” यानंतर राहुलला स्पर्धक आणि परीक्षक यांच्यातील नात्याबद्दल विचारण्यात आलं.
यावर राहुल असं म्हणाला, “पुर्वी परीक्षकांबरोबर एकदम खुलून बोललं जायचं नाही. तुम्ही जाऊन असं थेट ‘अरे फराह मॅम, कशा आहात?’ असं बोलू शकत नव्हता. परीक्षक म्हणून त्यांच्याविषयी एक आदर होता. ‘नमस्कार फराह मॅम’, ‘नमस्कार सोनू सर’ असं विनम्रपणे बोललं जायचं आणि तो एक चांगला बदल होता. आधी स्पर्धकांमध्ये परीक्षकांविषयी खूप जास्त शिस्त होती. ती का होती माहीत नाही. पण ती होती.”
दरम्यान, राहुल वैद्य हा एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने ‘इंडियन आयडल’च्या सीझन १ मध्ये सहभाग घेतला होता. अनेक अल्बम आणि चित्रपटातील गाण्यांना त्याचा आवाज लाभला आहे. शिवाय ‘जीता वही सुपरस्टार’, ‘संगीत का महा मुक्काबला’ आणि ‘बिग बॉस १४’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये त्याने सहभाग घेतला आहे. आपल्या गायकीने चर्चेत असणारा राहुल वैद्य सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो.