Indrayani Marathi Serial: काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील कोणती ना कोणती मालिका ऑफ एअर होताना दिसत होती. तीन, चार आणि पाच महिन्यांनी नव्या मालिकांचा गाशा गुंडाळला जात होता. पण अशातच तग धरून राहिली ‘इंद्रायणी’ मालिका. छोट्या इंदूची गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा अध्याय सुरू झाला. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी असणारी इंदू मोठी दाखवण्यात आली. अभिनेत्री कांची शिंदेने मोठ्या इंदूची भूमिका उत्तमरित्या साकारली असून ती घराघरात पोहोचली आहे. लवकरच आता ‘इंद्रायणी’ मालिकेतील बहुप्रतीक्षित क्षण पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेला नवं वळणं येणार आहे.
इंद्रायणी मोहितरावांचं आव्हान स्वीकारते. “पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन”, असं म्हणते. त्यामुळे इंदू हे वचन कसं पूर्ण करणार? गोपाळ, अधू आणि संपूर्ण गावाची साथ तिला कशी मिळणार? इंदूचे हे वचन मालिकेला नवं वळण देणार हे येत्या काळात ‘इंद्रायणी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. पण, असं असताना मालिकेत अजून एक ट्विस्ट येणार आहे; ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
लवकरच गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण, दुसरीकडे अधूला देखील इंदू आवडते असं दिसून आलं आहे. त्यामुळे ‘इंद्रायणी’ मालिकेत पुढे काय होणार? कुठलं वळण येणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावचा खरा चेहरा गावासमोर आणतात. यामुळेच मोहितराव चिडतो, तो इंदूवर आधीपासूनच वाईट नजर ठेवून आहे आणि आता तो स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवतो. मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो, तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवून, मोहितरावला बजावून सांगतो, “माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे.” गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार ? इंदू त्यावर काय उत्तर देणार? आणि कसं गोपाळ-इंदूचे प्रेम फुलणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
या सगळ्यात मोहितराव आता काही शांत बसणार नाही. मोहितरावाचा आता इंदूला विरोध असल्याने तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. इंदू गावात शाळा उघडण्याचं आव्हान व्यंकू महाराज, गोपाळ-अधू आणि फँटया गँगच्या सहाय्याने कसे पूर्ण करणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.