अभिनेत्री सायली संजीव व अभिनेता ऋषी सक्सेना या दोघांनी ‘काहे दिया परदेस’ मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यातील त्यांच्या शिव-गौरीच्या जोडीने अनेकांची मनं जिंकली होती. मराठी मुलगी व अमराठी मुलगा, अशी पार्श्वभूमी असलेल्या या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्या काळी ही मालिका प्रचंड गाजली होती. आजही अनेक जण ही मालिका पुन्हा पाहताना दिसतात. तर, प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अशातच सायली व ऋषीने नुकतीच ‘राजश्री मराठी शोबझ’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी ‘काहे दिया परदेस’च्या वेळचे अनेक किस्से सांगितले आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत ऋषीने मालिकेदरम्यान त्याच्याबरोबर घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. ऋषी म्हणाला, “माझ्याबरोबर सेटवर या लोकांनी खूप प्रँक केले आहेत. एक दिवस यांनी मला सांगितलं की, खाऊन बघ भाजी आहे. म्हणून मी भाजीसारखं खाल्लं; पण खाल्ल्यानंतर समजलं की तो ठेचा आहे.” त्यावर पुढे सायली म्हणाली, “त्याला तिखट अजिबात सहन होत नाही. त्यानं जेव्हा ठेचा खाल्ला, तेव्हा त्याला खूप त्रास झाला होता.”
‘काहे दिया परदेस’ ही त्या दोघांचीही पहिलीच मालिका असून, यापूर्वी त्यांनी कधीच मुख्य भूमिका साकारली नसल्याचं सांगितलं आहे. एकमेकांबद्दल बोलत असताना ऋषी म्हणाला, “आम्ही दोघंही नवीन असल्यानं सेटवर एकमेकांना मदत करायचो. माझी मराठी तितकीशी चांगली नसल्यानं सायलीनं मला खूप मदत केली. आम्ही दोघे सोडलो, तर मालिकेतील इतर कलाकारांनी आमच्यापेक्षा खूप जास्त कामं केलेली होती. त्यांचा अनुभवही आमच्यापेक्षा जास्त होता.”
सायली व ऋषी यांचा ‘समसारा’ नावाचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातून सायली-ऋषी यांना त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकत्र पाहता येणार आहे. ‘समसारा’ हा चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये त्यांच्यासह अभिनेते गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शिनी इंदलकर, तनिष्का विशे, निवेदिता पाटकर, साक्षी गांधी, कैलास वाघमारे यांसारखे कलाकार झळकणार आहेत.