Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत-जान्हवीची जोडी कायम चर्चेत असते. संशयी व विकृत स्वभावामुळे जयंतला नेहमीच ट्रोल केलं जातं. लग्नाआधी जयंत कायम जान्हवीशी प्रेमाने वागताना दिसायचा. पण, त्याच्या प्रेमामागे लपलेली विकृती, त्याचा विक्षिप्त स्वभाव हळुहळू जान्हवीसमोर येत आहे.
लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतने जान्हवीसमोर झुरळ खाल्लेलं असतं. याशिवाय जरा काही चूक केल्यास तो जान्हवीला भयंकर शिक्षा देत असतो. यामुळे जान्हवीने एकदा जयंतचं घर सोडून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण, शेवटी लग्न, प्रेम हा सगळा विचार करून ती घर परत येते. आताही जयंतच्या मनात जान्हवी अन् मॅडच्या ( विश्वा ) नात्याबद्दल संशय असतो. पण, ‘मॅड’ नेमका कोण आहे? हे जयंतला माहिती नसतं. आता जयंत जान्हवीची नवीन परीक्षा घेणार आहे.
जान्हवी वटपौर्णिमेचं व्रत करणार असते. यासाठी ती आदल्यादिवशी सगळी तयारी करून ठेवते. पण, विकृत जयंत एक मोठी खेळी खेळणार आहे. जान्हवी नवऱ्याला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत असते. पण, जयंत काही केल्या प्रतिसाद देत नसतो. कारण, हाच जयंतचा मूळ प्लॅन असतो. जान्हवी आपल्याला वाचवण्यासाठी काय-काय करू शकते हे त्याला पाहायचं असतं.
जयंत कोणाताच प्रतिसाद देत नसल्याने जानू खूप घाबरते. ती नवऱ्याचा पल्स चेक करते, त्याला शेवटी CPR देते पण, याचा काहीच उपयोग होत नाही… आता हतबल झालेली जान्हवी कोणता मार्ग काढणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
मात्र, मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: जयंतचा विकृतपणा पाहून प्रेक्षकांनी या प्रोमोवर संताप व्यक्त केला आहे.
“आम्ही ही मालिका रोज बघायचो आणि आता अजिबात बघत नाही नुसते रडत राहतात”, “हा जयंत मूर्ख आहे”, “काय चालू आहे त्या क्रिमिनल जयंतचं…बंद करा हा फालतूपणा”, “कसली परीक्षा घेतो… बायकोला त्रास द्यायची?”, “गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणारा कार्यक्रम आहे… नीचपणाचा कळस आहे”, “हे मूर्ख जोडपं रोजच्या भागात दाखवलंच पाहिजे का? बायको याच्यावर विश्वास कसा ठेवते? सगळंच अजब आहे”, “जान्हवी महामूर्ख आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.


दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही बहुचर्चित मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ८ ते ९ या एक तासाच्या वेळेत प्रसारित केली जाते.