Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या भावना-आनंदी जान्हवीच्या घरी राहायला गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भावनाचं मन शांत व्हावं यासाठी श्रीनिवास तिला काही दिवस जान्हवीच्या घरी राहायला जा असं सांगतात. याशिवाय जान्हवी सुद्धा ताईला आपल्या घरी न्यायला तयार होते. अनपेक्षितपणे जयंत सुद्धा या गोष्टीला परवानगी देतो.

मात्र, घरी आल्यावर आपल्या बायकोने सतत भावना-आनंदीच्या मागेपुढे करणं हे जयंतला प्रचंड खटकतं. तो भावना ताईंनी तुला काय सांगितलंय याबाबत जान्हवीकडे चौकशी करतो. पण, जान्हवी उत्तर देणं टाळते…”माझ्या बहिणीने मला विश्वासाने काहीतरी सांगितलंय, ते मी तुला कसं सांगू जयंत?” असं जान्हवी नवऱ्याला म्हणते. जानू आपल्यापासून काहीतरी लपवतेय ही गोष्ट जयंत अजिबात सहन करू शकत नाही आणि परिणामी तो बायकोला शिक्षा देण्याचा निर्णय घेतो.

जयंत जान्हवीचे हात बांधतो, तिच्या तोंडाला पट्टी बांधतो आणि तिला रात्रभर कपाटात डांबून ठेवतो. जान्हवीची मनात थोडीफार काळजी वाटत असल्याने ड्रील मशीन घेऊन तो कपाटाला ३-४ छिद्र पाडतो. हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड घाबरते. विकृत जयंतने लहानशा गोष्टीची अत्यंत भयंकर शिक्षा दिल्याने ती पूर्णपणे बिथरुन जाते. कपाटात तशीच रडत बसते, जयंतला बाहेर काढ अशीही विनंती करते. पण, तो काही केल्या ऐकत नाही.

भावना-आनंदी या सगळ्यापासून अनभिज्ञ असतात. त्यांच्यामुळे जान्हवीची वेळेत सुटका होते. पण, आता मात्र जान्हवी जयंतच्या या विकृतपणावर प्रचंड भडकलेली असते. तिच्या कॉलेजमध्ये रिझल्ट असतो. यावेळी जयंतला बरोबर नेण्यास ती स्पष्ट नकार देते. एवढंच नव्हे तर त्याच्या हातचं गोड दही सुद्धा नाकारते.

चिडलेली जान्हवी एकटी कॉलेजमध्ये जाते. पण, आता जयंत एक नवीन खेळी खेळून जान्हवीच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहतो. जान्हवीचा कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांक आल्याचं तो जाहीर करतो. बायकोला बक्षीस देण्याआधी तो एका माणसाला वाटीतून दही आणायला सांगतो. आता संपूर्ण कॉलेजसमोर जान्हवी सगळं काही विसरून जयंतला माफ करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग ११ मे रोजी रात्री ८ ते ९ या एक तासाच्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे.