मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अरविंद काणे हे प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा होते. नात गौतमीसह त्यांनी ‘माझा होशील ना’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.

हेही वाचा : “तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

अरविंद काणे यांनी १९५३ पासून नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. गौतमी आणि मृण्मयी या दोन्ही बहिणींचं आजोबांशी अत्यंत जवळचं नातं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर गौतमीने सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देणारी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

गौतमी देशपांडेची पोस्ट

प्रिय आजोबा
पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं….. पण आजोबा काय सांगू तुम्हाला ….इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही… कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं…. सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून…. नंतर आईचा पुनर्विवाह….नवीन कुटुंबामध्ये प्रवेश…. नवीन भावांचं सक्ख्यानपेक्षा जास्त प्रेम….तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश …..नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम….लग्न….. दोन गोड मुलांचा जन्म…. सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं….
तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा … “एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली …नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग “याला जीवन ऐसे नाव” म्हणत तुम्ही पुढे गेलात … “अशी पाखरे येति” म्हणत संसार सुरु झाला …. ” नाटककाराच्या शोधात तुम्ही सहा पात्र” फिरत गेलात ….पुढे “शेहेनशाह” बनून तुम्ही “नटसम्राट” असल्याचा दाखवून दिलंत …. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं “तो मी नव्हेच ” म्हणत राहीलात …. असे आयुष्याचे खरे खुरे “किमयागार ” ठरलात ….. “चाणक्य ” बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात …. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही …..

प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो … यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय …. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर …. तुम्ही आता मात्र शांत व्हा ….दमला असाल तुम्ही …. आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे …नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे ….तुमच्यातला हा ‘नट ” आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू …. अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू ….

तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य ….झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ….!!
रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते….अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते ….

तुमची नात आणि तुमची फॅन
गौतमी.

हेही वाचा : “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरविंद काणे यांनी ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे तब्बल ७५० प्रयोग केले होते. गौतमीने शेअर केलेल्या भावुक पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अरविंद काणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.