Mrunal Dusanis : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आजवर तिने ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. म्हणूनच मृणालला छोट्या पडद्याची लाडकी व आदर्श सून असंही म्हटलं जातं.

वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये मृणाल दुसानिस लग्नबंधनात अडकली. मृणालचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. अभिनेत्रीचा पती नीरज मोरे कामानिमित्त अमेरिकेत असायचा. तर, मृणाल २०२० पर्यंत भारतात होती. ‘हे मन बावरे’ ही मालिका संपल्यावर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि मृणाल सुद्धा अमेरिकेत शिफ्ट झाली. यादरम्यान ४ वर्षे तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. मार्च २०२४ मध्ये मृणाल आपल्या कुटुंबासह भारतात परतली. चार वर्षांनी भारतात परतण्याचा निर्णय का घेतला याबाबत मृणाल आणि नीरज यांनी ‘द अनुरुप शो’ या मुलाखतीत खुलासा केला आहे.

नीरज म्हणतो, “मी जवळपास १४ वर्षे अमेरिकेत होतो. मास्टर्सची २ वर्ष आणि पुढे १२ वर्ष नोकरी करत होतो. पण, अमेरिकेत राहूनही मला हे कुठे ना कुठे माहीत होतं की, आपल्याला पुन्हा भारतात जायचं आहे. इथे पुन्हा आल्यावर मला आयटीमध्ये काम करायचं नव्हतं. याउलट मला स्वत:चं काहीतरी सुरू करायचं होतं. अर्थात बिझनेसकडे कल होता आणि त्यात मृणालची साथ मिळाली. ती नेहमी म्हणायची, आपण एकत्र बिझनेस वगैरे काहीतरी करूयात. याविषयी आम्ही खूप चर्चा करायचो. फूड ट्रक किंवा कॅफे सुरू करूयात याविषयी सुद्धा आमच्या चर्चा व्हायच्या. सध्या भारतात फूड ट्रक कल्चर त्याप्रमाणात लोकप्रिय झालेलं नाहीये. म्हणून मग आम्ही रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला.”

मृणाल यावर म्हणाली, “जेव्हा अगदी आमचं नवीन-नवीन लग्न झालं होतं. तेव्हा सुद्धा रेस्टॉरंट सुरू करायचं याबद्दल आमची चर्चा व्हायची. आमचं मधल्या काळात असंही बोलणं झालं होतं की, मी अमेरिकेत शिफ्ट होते आपण तिथेच रेस्टॉरंट सुरू करूयात. कारण, जॉब करत असताना नीरजला ते सोयीचं पडलं असतं. याशिवाय सुरूवातीला नीरजने अनेक कॅफेजमध्ये वगैरेही काम केलं होतं. त्यामुळे त्या कामाचाही त्याला अनुभव होता. मग काही वर्षांनी नुर्वी झाली…त्यावेळी आम्ही जरा नीट विचार केला. तेव्हा असं जाणवलं… नुर्वीला अमेरिकेत मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या लोकांमध्ये जाऊयात.”

“नीरजला सुद्धा भारतात यायची इच्छा होती त्यामुळे मग… ती योग्य वेळ समजून आम्ही पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. कारण, नुर्वी सध्या लहान आहे पण, एकदा तिला कळायला लागलं असतं…तेथील राहणीमान आवडू लागलं असतं तर, त्यानंतर आम्हाला तिचा विचार करून पुन्हा भारतात येणं अवघड वाटलं असतं. पण, सध्या ती लहान आहे त्यामुळे आताच शिफ्ट होऊयात असं आम्ही ठरवलं आणि आम्ही दोघंही वेळेत निर्णय घेऊन पुन्हा मायदेशी आलो.” असं मृणालने सांगितलं.