मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकार अगदी जीव ओतून काम करत असतात. आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते दिवस-रात्र मेहनत घेत असतात. मात्र या सगळ्या धावपळीत ते स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. शूटिंगचं व्यस्त वेळापत्रक, कामाचा ताण आणि अशा अनेक कारणांनी कलाकारांचं त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. परिणामी त्यांना नंतर मोठ्या आजाराला सामोरे जावे लागतं. असंच काहीसं झालं होतं एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीबरोबर. ही अभिनेत्री म्हणजे शाश्वती पिंपळीकर.
‘बालक पालक’ या लोकप्रिय चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळीकरने नुकतंच तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं. वर्षभरापुर्वी अभिनेत्रीला एका आजाराचा सामना करावा लागला. यासाठी तिने काही काळ अभिनयापासून ब्रेकही घेतला होता. याबद्दल तिने हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “‘मुरांबा’ मालिकेत मी आरती ही भूमिका करत होते. ही मालिका करत असतानाच मला साधारण सर्दी-खोकळा होतो तसं झालं होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या भावाचं लग्न होतं, त्यामुळे सगळी धावपळ सुरू होती. त्यात माझी शूटिंगचीही धावपळ होती.”
यानंतर ती म्हणाली, “तर दोन-तीन महिने झालेला सर्दी-खोकळा जातच नाहीय हे माझ्या लक्षात आलं. माझं त्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं. त्यामुळे माझ्या फुफ्फुसांवर त्याचा परिणाम झाला होता. तुम्हाला खूप काळ सर्दी-खोकळा राहिला तर त्याचा फुफ्फुसांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. ‘मुरांबा’ मालिका सोडल्यानंतर माझी परिस्थिती अशी होती की, दोन-तीन पायऱ्या चढल्यानंतरही मला थांबावं लागायचं. याबद्दल माझ्या खूप उशिरा लक्षात आल्यानंतर मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.”
यापुढे शाश्वतीने सांगितलं की, “त्यादरम्यान मला अनेक शोसाठी ऑफर आल्या होत्या. कारण लोकांना याबद्दल माहिती नव्हतं. मला नाटक आणि चित्रपटांसाठी विचारण्यात आले होतं; पण मी ठरवून सगळ्याला नाही म्हटलं. यानिमित्ताने मी सांगेन की, यातून बरं होणं हे खूप कठीण होतं. मी शांत बसणारी मुलगी नाही, त्यात सगळं काम अचानक बंद झाल्यानंतर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मी नैराश्येत वगैरे गेले होते असे मोठे शब्द वापरणार नाही.”
यानंतर तिने सांगितलं, “यादरम्यान माझ्याबरोबर माझं कुटुंब, माझे काही जवळचे मित्र सोबतीला होते. पण तो वर्ष-दीड वर्ष काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. मी आता पाठ टेकून बसले आहे; तशी मी एक वर्ष पाठ न टेकवता बसले नव्हते. कारण पाठ टेकवली की, मला खोकळा सुरू व्हायचा. ढास लागायची आणि ती लागली की पंधरा ते वीस मिनिटे ती ढास राहायची. यात माझी प्रतिकारशक्ती खूप कमी झाली होती. आता मी या सगळ्यातून हळूहळू बरी होत आहे. यासाठी दोन-तीन वर्ष लागू शकतात असा सल्ला माझ्या डॉक्टरांनी दिला आहे.”
यानंतर शाश्वतीने सांगितलं की, “अशा वेळेस मला ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये इतक्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळे लोक मला समजून घेत आहेत. माझी काळजी घेतात. मला धुळीची ऍलर्जी आहे. त्यामुळे कुठे बाहेर शूटिंग असेल तर माझ्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. यामुळेच मी एका उत्तम मालिकेचा भाग होऊ शकले.” दरम्यान, ‘बालक पालक’नंतर शाश्वतीने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘चाहूल’ या मालिकांत काम केलं. सध्या ती ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.