Premachi Goshta Last Day Of Shooting : जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये ही मालिका ऑन एअर झाली होती. त्यावेळी अभिनेत्री तेजश्री प्रधान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये म्हणजेच साधारण ६ महिन्यांपूर्वी तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’मधून एक्झिट घेतली आणि याचा फटका मालिकेच्या टीआरपीवर झाला.
तेजश्री प्रधान या मालिकेत मुक्ता कोळी हे पात्र साकारत होती. तिच्या एक्झिटनंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळेची ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये वर्णी लागली. कमी टीआरपीमुळे वाहिनीने दोनवेळा या मालिकेची वेळ देखील बदलली आणि आता ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
नुकतंच या मालिकेचं शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पडलं. यावेळी सगळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. “प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवटचा दिवस… सर्वांनाच खूप मिस करू, एक पर्व संपलं” याशिवाय सागरची बहीण स्वातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नम्रता सुमिराजने देखील सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील बालकलाकार सई म्हणजेच इरा परवडेने शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांना सुंदर गिफ्ट्स दिल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय मालिकेचे मुख्य कलाकार स्वरदा ठिगळे आणि राज हंचनाळे यांनी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत मालिका निरोप घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका या आठवड्यात संपणार आहे. ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जायची. आता याऐवजी ७ जुलैपासून समृद्धी केळकरची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘हळद रुसली, कुंकू हसलं’. यामध्ये समृद्धीसह ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे.