स्टार वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यामधील खलनायिका शालिनी गौरी-जयदीपच्या प्रेमाचा शेवट करून त्यांचं आयुष्य संपवणार असल्याचा प्रोमो मध्यंतरी प्रसिद्ध करण्यात आला होता. यानंतर अनेकांनी आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका संपणार असा अंदाज वर्तवला होता. परंतु, लवकरच या मालिकेत गौरी-जयदीपच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मालिकेत जवळपास २५ वर्षांचा लीप आला असून आता प्रत्येकाचं आयुष्य पुढे सरकलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येत्या काही दिवसांमध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. अर्थात गौरी नित्या, तर जयदीप अधिराजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नित्या-अधिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणती नवी पात्र असणार? याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : ‘देऊळ’मधील ‘त्या’ संवादाची आठवण काढणाऱ्या चाहत्याची हृषिकेश जोशींनी घेतली दखल; म्हणाले, “यांना दंडवत…”

२५ वर्षांच्या लीपनंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम सौंदर्या अर्थात अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची एन्ट्री होणार आहे. त्या मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसतील. ‘वसुंधरादेवी अहिरराव’ असं त्यांच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आणि हटके असेल.

हर्षदा खानविलकर याविषयी म्हणाल्या, “‘स्टार प्रवाह वाहिनीने माझ्यावर विश्वास ठेऊन नेहमीच नवनव्या भूमिकांसाठी माझी निवड केली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीये. भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र, मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे. वसुंधरादेवीचा गावात दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापूरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे.”

harshada
हर्षदा खानविलकर

हेही वाचा : “तू कधीच पत्नीचं कौतुक करत नाहीस,” गश्मीर महाजनी चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “खूप कमी लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका नव्या रुपात प्रेक्षकांना येत्या २० नोव्हेंबरपासून पाहायला मिळणार आहे. ही मालिका रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.