Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रिया काही ना काही कुरघोड्या करुन सायलीला त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरच या दोघींमध्ये मालिकेत जोरदार भांडण होणार आहे. खरंतर यापूर्वी सायली प्रियाकडे दुर्लक्ष करून तिच्या चुका सावरून घेत होती. पण, आता सायली कमीपणा न घेता प्रियाला चांगलाच धडा शिकवणार आहे.

प्रिया झोपेतून उठून येते आणि अरेरावी करून विमलकडे कॉफी मागते. “हातातलं काम झालं की, मी तुम्हाला पटकन कॉफी देते” असं विमल तिला सांगते. पण, प्रिया अजिबात ऐकत नाही. मला आताच्या आता कॉफी हवी म्हणजे हवी…या रुबाबात ती विमलवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करते. इतक्यात सायली विमलला सांगते. ताई प्रिया थोडावेळ थांबू शकते…तुम्ही हातातलं काम पूर्ण करा. यामुळे प्रिया भयंकर संतापते आणि घरात आरडाओरडा करायला सुरुवात करते.

प्रियाचा आरडाओरडा ऐकून कल्पना, प्रताप, अर्जुन, अश्विन सगळेजण बाहेर येतात. सगळे बाहेर आल्यावरही प्रिया शांत होत नाही, उलट नवऱ्याला पाहून ती अजून मोठमोठ्याने सायलीशी वाद घालू लागते. प्रिया मुद्दाम सर्वांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी सायलीला म्हणते, “माझा सतत अपमान करण्यापेक्षा मला घराबाहेर काढ ना…” यानंतर नेहमीप्रमाणे अश्विन खोटारड्या बायकोची बाजू घ्यायला पुढे येतो आणि अर्जुन-सायलीचा अपमान करतो.

अश्विन म्हणतो, “आपण का घराबाहेर जायचं? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात आपण अनधिकृतरित्या राहत नाही आहोत.” धाकट्या भावाचे हे शब्द ऐकून अर्जुनचा राग अनावर होतो. तो संतापून त्याच्यावर हात उचलणार असतो पण, समोर आपला भाऊ आहे हा विचार करून अर्जुन स्वत:ला सावरतो. त्याचे डोळे पाणावतात.

नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून सायली किचनमधून बाहेर येते आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली वाजवते. मालिकेत तिचं पहिल्यांदाच रौद्ररुप पाहायला मिळणार आहे. ती प्रियाला सक्त ताकीद देत म्हणते, “तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय पण, हे शेवटचं आहे… यापुढे जो चुकणार तोच रडणार…”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग २६ मे रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता यानंतर प्रताप-कल्पना कोणाची बाजू घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.