Savalyachi Janu Savali Upcoming Twist: कोणत्याही मालिकेत येणारे नवीन वळण प्रेक्षकांची उत्सुकता वाढवते. आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘सावळ्याची जणू सावली‘ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत सारंग व सावली यांची गोष्ट पाहायला मिळते. सुमधुर आवाज असणारी, सावळ्याची रंगाची सावली सारंगची पत्नी म्हणून मेंहेदळेंच्या घरी येते, जिथे सावळ्या रंगाचा तिरस्कार केला जातो. श्रीमंती व गोऱ्या वर्णाला तिथे अवाजवी महत्त्व दिले जाते. त्यामुळे गरीब घरातील सावलीला तिलोत्तमा, ऐश्वर्या यांच्याकडून पावलोपावली अपमान सहन करावा लागतो.
तारासाठी सोहमचे स्थळ घेऊन आलेल्या तिलोत्तमाला भैरवी देणार नकार
सारंग, सोहम, सारंगचे वडील, त्याची मोठी वहिनी सावलीला चांगली वागणूक देतात. तिच्यावर माया करतात. सावली व सारंग यांच्यातील मैत्रीचीही आता प्रेक्षकांना भुरळ पडू लागली आहे. या सगळ्यात सोहम व तारा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, भैरवी ताराचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याच्या तयारीत आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की. तारा सोहमला फोन करते. ती त्याला रडत म्हणते की, मला हे लग्न करायचं नाही. तू काहीतरी कर. त्यावेळी तिथे सावलीदेखील असते. सोहमच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव पाहून ती त्याला काय झालं, असं विचारते. त्यावर सोहम तिला सांगतो की, उद्या ताराच्या घरी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तिलोत्तमा तिच्या मैत्रिणीकडे म्हणजे भैरवीकडे गेली आहे. ती भैरवीला म्हणते की, माझ्या सोहमसाठी तुझ्या ताराचा हात मागायला आली आहे. पण, त्यावर भैरवी म्हणते, “मला हे नातं मान्य नाही.” तसेच ती तिलोत्तमाला घरातून जाण्याचेदेखील सुचवते. त्यावर तिलोत्तमा संतापाने म्हणते, “आता मी जाईन. परत तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही.” त्यानंतर ताराच्या सुपारीचा कार्यक्रम पार पडल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्यात तारा मात्र दु:खी दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोहम ताराचं लग्न थांबवू शकणार का? अशी कॅप्शन दिली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सावली ही गरीब कुटुंबातील आहे. तिचा लहान भाऊ आजारी असतो. त्यामुळे तिच्या घरच्यांना पैशांची गरज असते हे ओळखून भैरवीने सावलीचा आवाज तिच्याकडे गहाण ठेवून घेतलाय. त्या बदल्यात ती सावलीच्या घराची काळजी घेईल, त्यांना पैसे देईल, असे वचन तिने दिलेय. त्यामुळे सावली भैरवीच्या मुलीसाठी म्हणजेच तारासाठी गाते. जगाला जो आवाज ताराचा आहे, असे वाटते. तो खरे तर सावलीचा आहे.
सावलीला सोहम व ताराच्या प्रेमाबाबत माहीत आहे. आता ती यातून कसा मार्ग काढणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.