यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. येत्या ५ जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडण्याची लक्षणे नसल्याचे हवामान खात्याने सरकारला कळविल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच उभ्या राहिलेल्या या संकटामुळे सरकारच्या तोंडचे पाणी पळाले असून संभाव्य संकटाच्या मुकाबल्यासाठी मोठय़ा शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्याच्या हालचाली मंत्रालयात सुरू झाल्या आहेत.  
गेली दोन वर्ष राज्यावर आलेल्या नसíगक आपत्तीने शेतकरी हैराण आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून राज्य व केंद्र सरकारला दोन वर्षांत ९ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना द्यावी लागली आहे. यंदाही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच पाऊस लांबल्याने पेरण्याही रखडल्या आहेत. शेतकरी पावसाच्या आगमानाकडे डोळे लावून बसला असतानाच येत्या ५ जुलैपर्यंत पावसाचे आगमन लांबण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळी संकट ओढवण्याच्या भीतीने सरकार धास्तावले आहे.

* आतापर्यंत २५-३० टक्के पेरण्या होण्याची गरज असताना केवळ दीड टक्का पेरण्या झाल्या आहेत.
* राज्यातील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे आणि टँकरची मागणी वाढत असल्याने सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे.
* आजमितीस नागपूर विभागातील धरणांमध्ये ४६ टक्के पाणीसाठा असला तरी मराठवाडय़ात २०, नाशिक विभागात १४, पुणे विभागात  फक्त १३ टक्के पाणीसाठा आहे.
* १४६४ गावे आणि ३६८७ पाडयांमध्ये १४५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकरच्या मागणीत वाढ होत असून शहरी भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ातही घट होत असल्याने पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे. पुण्यात २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असून मुंबईतही पाणीकपातीचा विचार सुरू आहे. हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री