संदीप आचार्य
मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत करोना रुणांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घेता राज्यातील करोनाबाधित शहरात लॉकडाऊनचा काळ वाढवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. अर्थात केंद्र सरकारशी व मंत्रिमंडळातील चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने खबरदारीच्या अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दोन हजारांहून अधिक पथके जागोजागी सर्वेक्षणाचे काम करत आहेत. आयुषच्या सव्वा लाख डॉक्टरांना करोनाबाबत प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यातही मुंबई व पुण्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी १४ एप्रिल रोजी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान मुंबई-पुण्यासह जेथे करोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेथे लॉकडाऊनचा कालावधी वाढवलाच पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांशी याबाबत चर्चा होत असते. सध्याचा लॉकडाऊन किमान करोनाबाधित शहरांमध्ये वाढवला पाहिजे असे सर्वाचेच मत दिसून येते, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. अर्थात आजच याबाबत निर्णय घेता येणार नाही तर १२ एप्रिलपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन मगच निर्णय घ्यावा लागेल. केंद्र सरकारशीही याबाबत बोलावे लागेल, असे टोपे म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन व आयसीएमआरच्या उच्चपदस्थांशी आपले जवळपास रोज बोलणे होत असून केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीतजास्त करोना संरक्षित सूट, मास्क आदी बाबी मिळाव्या यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाले.
आयसीएमआर वा केंद्राकडून जलद करोना चाचणीबाबत सूचना असल्या तरी वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे काही ज्येष्ठ अधिकारी करोनाच्या या रॅपिड चाचणीसाठी अनुकूल नाहीत. या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जलद चाचणीच्या अचूक निष्कर्षांचे प्रमाण ४० टक्के एवढे आहे. तथापि व्यापक प्रमाणात चाचणी करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास जलद चाचणीचा पर्याय वापरावा लागेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
करोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार नाही तसेच करोनाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय आहे. देशभरात ६२ जिल्ह्य़ामध्ये करोनाचा प्रभाव असून २४७ जिल्ह्य़ांत करोनाने हातपाय पसरले आहेत.