कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिल्याने, ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता भाजपाकडू ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडता, असा टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
“मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे MMRDA ला निर्देश…गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई…”असं भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.
कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा; ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका
तर, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला, “विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो कारशेड : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले…
तसेच, “मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचं नुकसान होतं. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं,” असंही ते यावेळी म्हणाले.