मुंबईमधील १०० वर्षे जुन्या चाळी आजही ताठ मानेने उभ्या असताना केवळ ३०-३५ वर्षांपूर्वी आपणच बांधलेल्या इमारती प्रदूषणामुळे जीर्ण होऊ लागल्याचा अजब दावा महापालिकेने केला आहे. त्यातच प्रशिक्षित कर्मचारी असतानाही या इमारतींच्या संरचनात्मक संकल्पचित्रासाठी पालिकेने तब्बल १८ सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेने विविध ठिकाणी ३०-३५ वर्षांपूर्वी बांधलेली प्रसूतीगृहे, रुग्णालये, बाजार, अग्निशमन स्थानक, पालिका कर्मचारी निवासस्थानांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. माहीम येथील अल्ताफ मॅन्शन आणि डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाने पालिकेच्या इमारतींची चाचपणी सुरू केली आहे. यात१९८० च्या सुमारास बांधलेल्या इमारती धोकादायक बनू लागल्याचे निदर्शनास आले आहे. असे असताना मुंबईतील अनेक चाळी १०० वर्षे होऊनही आजघडीला ताठ मानेने उभ्या आहेत. वेळोवेळी झालेल्या दुरुस्तीमुळे या इमारती आजही भक्कम आहेत. उलटपक्षी पालिका अधिकाऱ्यांनी देखभालीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ३०-३५ वर्षांमध्येच इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बडगा उगारण्याचे धाडस सत्ताधारी अथवा विरोधी पक्षामध्ये नाही.
पालिकेने या इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती/पुनर्वसन व संरचनात्मक संकल्पचित्रासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कॅसर क्राफ्ट प्रॉपर्टीज अॅण्ड इंजिनीअरिंग सव्र्हिसेस, रिट्रो फिटर्स कन्सल्टींग इंजिनीअर्स, ग्लोबल इंजिनीअरिंग सव्र्हिसेस, एच. एम. राजे स्ट्रक्चरल कन्सल्टंन्टस, दीपक डी. कुलकर्मी, विजना कन्सल्टींग इंनिनीअर्स, क्रिएटिव्ह कन्सल्टन्टस, बी. एस. ए. कन्सल्टन्टस, प्रोफेसर डी. डी. देसाईस् असोसिएटेड इंनिनीअरगिं कन्सल्टंटस्, स्पेस डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेन्ट, जस्ट इंजिनीअर्स, टेक्नाजेम कन्सल्टंटस्, बी. जे. मेहता आर्किटेक्चरल अॅण्ड स्ट्रक्चरल कन्सल्टंटस्, नयन ढोलकिया, व्ही. जे. जोशी अॅण्ड असोसिएटस् कन्सल्टींग स्ट्रक्चरल इंजिनीअर्स, नियो टेक कन्सल्टंटस्, एस. एन. भोबे अॅन्ड असोसिएटस्, बर्वे कन्सल्टंटस् यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विविध चाचण्यांसाठी प्रती चौरस फूट, तसेच प्रती नग दराने सल्लागारांना पैसे देण्यात येणार आहेत. पालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभाग, तसेच संकल्पचित्रे विभागात सक्षम अधिकारी-कर्मचारी वर्ग असताना सल्लागारांची नियुक्ती करणाऱ्या प्रशासनावर पालिका वर्तुळात टीका होऊ लागली आहे. हे काम पालिका कर्मचाऱ्यांकडूनच करुन घ्यावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत असताना प्रशासनाने सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठीकत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राजकारणी मंडळी कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
१०० वर्षे जुन्या इमारती भक्कम : महापालिकेच्या ३० वर्षांच्या इमारती म्हणे प्रदूषणामुळे जीर्ण!
मुंबईमधील १०० वर्षे जुन्या चाळी आजही ताठ मानेने उभ्या असताना केवळ ३०-३५ वर्षांपूर्वी आपणच बांधलेल्या इमारती प्रदूषणामुळे जीर्ण होऊ लागल्याचा अजब दावा महापालिकेने केला आहे.
First published on: 31-12-2013 at 03:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 years old building strong bmc shocking opinion