मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी १०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या १ हजार ९१४ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे.राज्यामध्ये शुक्रवारी करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत.
राज्यामध्ये शुक्रवारी सापडलेल्या १०२ रुग्णांमध्ये २७ रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सापडले. त्याखालोखाल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २६, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सांगली जिल्हा, सांगली महानगरपालिका, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी पाच जण रुग्ण सापडले.
मालेगाव महानगरपालिका हद्दीत ४, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी ३, नवी मुंबई महानगरपालिका, अमरावती जिल्हा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी २, अकोला, नागपूर व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. राज्यामध्ये शुक्रवारी चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. यातील तीन रुग्ण हृदयविकाराने त्रस्त होते. तर एका रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या २५ वर पोहचली आहे.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २० हजार ४६८ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ९१४ जण बाधित आढळले. आतापर्यंत १२७६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, ६१३ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.