पल्लवी स्मार्त
मुंबई : सौरऊर्जा क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडविण्याची क्षमता असलेले संशोधन मुंबई आयआयटीमध्ये झाले असून त्यामुळे संचामध्ये होणारा खर्च २० टक्के कमी होऊन ऊर्जानिर्मिती ३० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करता येईल का, याबाबत राज्य शासनाने चाचपणी सुरू केली आहे.
राज्य सरकार आणि मुंबई आयआयटीमधील ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन्स अँड आंत्रप्रुनिअरशिप’च्या (एसआयएनई) आर्ट-पीव्ही इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून डिसेंबर २०२७पर्यंत या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे नव्या तंत्रज्ञानामुळे सौरऊर्जा संचांच्या कच्च्या मालासाठी चीनवरील अवलंबित्व कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी दिली.
नव्या तंत्राच्या व्यावसायिक वापराबाबत ‘महाजेनको’ला सूचना केल्याचेही ते म्हणाले. प्रा. दिनेश काब्रा यांच्या नेतृत्वाखालील आयआयटी संशोधकांनी ‘नॅशनल सेंटर फॉर फोटोव्होल्टिक रिसर्च अँड एज्युकेशन’ येथे हे संशोधन केले. यामध्ये पारंपरिक सिलिकॉन आधारित सोलार सेलच्या वर अर्धपारदर्शक पेरोव्हेस्काईट सोलर सेल (पीएससी) बसविण्यात यश आले आहे. यामुळे प्रकाश जास्त शोषला जाऊन ऊर्जानिर्मिती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘पेरोव्हेस्काईट’चे कमी आयुष्यमान ही मुख्य अडचण होती. मुंबई आयआयटीने संशोधन करून त्याचे जीवनमान १० वर्षांपर्यंत नेले आणि ही महत्त्वाची गोष्ट ठरली. विशेष म्हणजे, सध्याच्या कच्च्या मालावर चीनची मक्तेदारी असली, तरी ‘पेरोव्हेस्काईट’ला असे कोणतेही बंधन नाही.
– प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार पारंपरिक ‘सिलिकॉन सेल’च्या वर ‘पेरोव्हेस्काईट सेल’ बसवून वापरायोग्य बनविण्यात संशोधकांना यश आले आहे. पेरोव्हेस्काईट सेल’ १० वर्षांनंतर बदलण्याची गरज पडणार असली, तरी यामुळे महागड्या सिलिकॉन सेलचे आयुष्यमान २० वर्षांपर्यंत वाढणार आहे.