मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीला ९ जून २०२५ रोजी सुरुवात होणार असून ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. या सहलीचे आरक्षण करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून पर्यटकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ही सवलत देण्यात येणार आहे.

या सहलीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात होणार असून पर्यटकांना दादर, ठाणे स्थानकावरूनही सहलीत सहभागी होता येणार आहे. सहलीत सहभागी पर्यटकांना किल्ले रायगड, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ले, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांना भेट देता येणार आहे. हा सर्व प्रवास अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या रेल्वेगाडीला शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले असून या गाडीची क्षमता ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याइतकी आहे.

सीएसएमटीवरून माणगावला पोहोचल्यानंतर किल्ले रायगडला भेट देता येणार आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. यानंतर पर्यटकांचा रात्री पुण्यात मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या पुण्यातील ऐतिहासिक स्थळांचे भेट देऊन रात्रीचा मुक्काम पुण्यात केला जाईल. तसेच तिसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन, त्यानंतर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली जाईल. त्यानंतर रात्रीचा मुक्काम पुण्यात असेल. चौथ्या दिवशी प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठी साताराला रवाना होणार आहेत. रेल्वेगाडीने कोल्हापूरला जाण्याचा प्रवास सुरू होईल. तर, पाचव्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सहलीचा समारोप होईल, अशी माहिती आयआरसीटीसीतर्फे देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआरसीटीसीने पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी किफायतशीर दरात आणि आरामदायी सहलीचे नियोजन केले आहे. तसेच आरक्षण करणाऱ्या पहिल्या १०० पर्यटकांना ५ टक्के सूट देण्यात येत आहे. पर्यटक तीन श्रेणींमधून प्रवास करता येणार आहे. शयनयान डब्यासाठी १३,१५५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी १९,८४० रुपये आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी २७,३६५ रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये जीएसटी, जेवण व इतर खर्च समाविष्ट आहे, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.