मुंबई: अपघातानंतर कायमचे अपंगत्व आलेल्या २६ वर्षांच्या तरूणाला केवळ शारीरिक आणि मानसिक त्रासच सहन करावा लागत नाही तर त्याच्या वैवाहिक नातेसंबंधावरही त्याचा परिणाम होतो. मुलांचे पालनपोषण करण्याची त्याची स्वप्ने भंग पावतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच याचिकाकर्त्याच्या नुकसानभरपाईत एक कोटी रुपयांपर्यंत वाढ केली.योगेश पांचाळ हे २००४ मध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांना कायमचे अपंगत्त्व आले. नुकसानभरपाईसाठी पांचाळ यांनी मोटार वाहन अपघात दावा लवादाकडे अर्ज केला होता. लवादाने त्यांना ४८ लाख रुपयांची नुकसान भरपाई ७.५ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाबाबत असमाधानी असलेल्या पांचाळ यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली व भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने पांचाळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना नुकसानभरपाईच्या रकमेत अतिरिक्त ६४ लाख ८६ हजार ७१५ रुपये एवढी वाढ केली. भविष्यातील वैद्यकीय खर्चाची २३ लाख १८ हजाक रुपयांची रक्कम मात्र न्यायालयाने त्यातून वगळली. अपघातानंतर पांचाळ यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या कमरेखालचा भाग पूर्णपणे निकामी झाला आहे. या अपघाताने केवळ त्यांच्याच नाही, तर त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला आहे. त्यांच्या मुलांप्रतीच्या जबाबदाऱ्यांवर मर्यादा आल्या असून मुलांना पालकांचे प्रेम, मार्गदर्शन यापासून वंचित राहावे लागत आहे, असे न्यायालयाने पांचाळ यांच्या दिलासा देताना नमूद केले.

हेही वाचा : “…तर बॅगा भरायच्या आणि देश सोडून जायचं,” मनसेकडून मुस्लिमांना इशारा, म्हणाले “अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांची गरजच नाही”

पांचाळ हे २९ नोव्हेंबर २००४ रोजी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना मुलुंडमधील सोनापूर बसस्थानकाजवळ त्यांना मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. पांचाळ हे धातू कापणीचे काम करायचे आणि त्यांना वार्षिक १.६ लाख रुपये पगार मिळत होता. अपघातात पांचाळ यांना बऱ्याच ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर महागडे उपचार करण्यात आले.

हेही वाचा : मुंबई: राणीच्या बागेतील बाल शिवाजीच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतरही अपघातग्रस्तांचे जीवन पूर्ववत होऊ शकत नाही

आर्थिक भरपाईचा आकडा कितीही जास्त असला तरी अपघातग्रस्ताचे जीवन पूर्ववत करू शकत नाही किंवा त्याचे शारीरिक किंवा मानसिक आघात कमी करू शकत नाही. पती-पत्नीची उद््ध्वस्त झालेली स्वप्ने, मुलांचे हरवलेले बालपण परत आणू शकत नाही, असेही न्यायालयाने पांचाळ यांची याचिका योग्य ठरवताना नमूद केले.