मुंबई : गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांहून अधिक कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आपआपल्या गावी, वाड्या-वस्त्यांवर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे चालक-वाहक, त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
यावर्षी गणेशोत्सवात एसटीतर्फे कोकणवासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसची सोय करण्यात आली होती. या बसच्या १५ हजार ३८८ फेऱ्यांमधून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. एसटी महामंडळाने प्रवाशांची सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने योग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यावर्षी तब्बल ५ हजार बसद्वारे ५ लाख ९६ हजाराहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजाराहून अधिक चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.
कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसगाड्यांना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बस तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
गणपती विशेष जादा बस चालवण्यासाठी राज्यातील इतर विभागातून बस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथील विभागात पाठवण्यात येतात. त्यानंतर या बसचे गट आरक्षण झाल्यानंतर, त्या परतीचा प्रवास करताना रिकाम्या येत होत्या. त्यामुळे महामंडळाचा इंधनावर जादा खर्च होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी ३० टक्के जादा भाडेवाढ केली होती. मात्र या निर्णयाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला.