शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदनही त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले.
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले. त्या जागेवर त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. त्याला आपल्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे आठवले यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात इंदू मिलच्या जमिनीच्या प्रश्नावर  आरपीआयच्या नेत्यांची बैठक घेतली. इंदू मिलच्या अध्र्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे व अध्र्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे अशी मागणी होत आहे, असे आठवले यांच्या निदर्शनास आणले असता, तशी शिवसेनेने मागणी केलेली नाही, उलट इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठी देण्यास खुद्द बाळासाहेबांनीच पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठी द्यावी अशी पहिल्यांदा मागणी करणारे कामगार नेते विजय कांबळे यांनीही शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यास पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांचे योग्य ठिकाणी भव्य स्मारक व्हावे, त्याला दलित समाजाचा पाठिंबाच राहील, असे ते म्हणाले.