मुंबई- मागील ५ वर्षांपासून भारतात घुसखोरी करून बेकायदेशीरित्या वास्तव्य करणार्या एका बांग्लादेशी दांपत्याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. कोलकात्यामधून त्यांनी बनावट पारपत्र तयार केले होते. त्या आधारे जर्मनीला जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र विमानतळ अधिकार्यांना संशय आल्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी केेलेली फसवणूक उघडकीस आली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवारून सोमवारी गोविंद सहा (७१) गौरी सहा (६०) नावाचे एक दांपत्य जर्मनी येथे जाण्यासाठी आले होते. दुबई मार्गे ते जर्मनीच्या हंबर्ग येथे जाणार होते. त्यावेळी इमिग्रेशन अधिकारी सुप्रिया लोंढे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत होत्या. त्यांच्या प्राथमिक चौकशीतून लोंढे यांना संशय आला. अधिक चौकशी केली असता ते दांपत्या बांग्लादेशी नागरिक असल्याचे आढळून आले, २०१९ मध्ये त्यांनी भारतात बांग्लादेशातून बेकायदेशीर प्रवेश केला होता. ५ वर्ष ते भारतात वास्तव्य करत होते. २०२४ मध्ये त्यांनी कोलकाता येथून दलालामार्फत बनावट भारतीय पारपत्र तयार केले होते. या पारपत्राच्या आधारे ते जर्मनीत जाण्याचा प्रयत्न करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दांपत्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहार पोलिसांनी त्यांच्या विरोधात विदेशी व्यक्ती अधिनियम १४ (अ) १४ (ब) पारपत्र अधिनियम १२ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८, ३३६ (२) ३३६ (४) आणि ३४० (२) अन्वये सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.