लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्याच्या तोंडावर डोंगरावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. गोवंडी, मानखुर्द, देवनारचा समावेश असलेल्या एम पूर्व विभागातील डोंगरावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेने मुंबईतील डोंगर उतारांवर राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत २९९ ठिकाणी दरडींवर वसाहती असून त्यापैकी सर्वाधिक दरडी या पूर्व उपनगरात आहेत. मानखुर्द परिसरातील गौतमनगर, पांजरापोळ, ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारा तांडा, हशू अडवाणी नगर, रायगड चाळ, विष्णू नगर, भीमटेकडी, वाशी नाका या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावरील झोपडपट्टीवासियांना महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा… मुंबईवर पाणीकपातीचे ढग; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरी १५.५७ टक्के पाणीसाठा

कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची, तसेच डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारती / झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाने सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा… मुंबई: महिला पोलिसांबद्दल ट्वीटरवर अश्लील विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा

‘एम पूर्व’ विभागांतील झोपड्या, इमारतींमधील रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असा इशारा ‘एम पूर्व’ विभागाने दिला आहे.