मुंबई : कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीलगत वसलेल्या झोपडीधारकांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. मुंबई महानगरपालिकेने येथील झोपडीधारकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरच नदीलगत ३५० मीटरची संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला असून पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे नदीलगतच्या झोपड्यांचे पुरापासून संरक्षण होणार आहे. संरक्षण भिंतीच्या बांधणीदरम्यान बाधित झोपडीधारकांचेही कांदिवलीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: ललित पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोईसर नदीलगतच्या हनुमान नगर, समर्थवाडी, सरस्वती चाळ, गंगा नगर, जनता नगर, भाजीवाडी आदी परिसरात वास्तव्याला असलेले झोपडीधारक गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर परिस्थितीला सामोरे जात आहेत. पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून येथील बाधित झोपडीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये स्थलांतर करून पोईसर नदीचे पात्र खोल करण्यात सुरुवात केली आहे. गतवर्षी सुमारे १६ अनधिकृत बांधकामांवरही पालिकेने कारवाई केली होती. आता नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संरक्षण भिंतीसाठी अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच झोपडीधारकांना पर्यायी घरेही देण्यात येणार आहेत. पोयसर नदीची ३५० मीटर संरक्षण भिंत बांधण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या ३३ झोपड्यांवर पालिका आर. दक्षिण विभागाने नुकतीच कारवाई केली असून संरक्षण भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भिंत स्टॉर्म वाटर ड्रेन (पर्जन्य जलवाहिनी) विभागाकडून लवकरच बांधण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.