मुंबई : भारतात महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सरचा प्रकार म्हणजे स्तन कर्करोग. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर) व नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (एनसीडीआयआर) च्या २०२३ च्या एनसीआरपी (नॅशनल कॅन्सर रजीस्ट्री प्रोग्राम) च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे २.३ लाख स्तन कॅन्सर रुग्णांची नोंद होते. त्यातील सुमारे १.३ लाख मृत्यू हे उशिरा निदान व उपचाराच्या अभावामुळे होतात. २०२४ मध्ये यात वाढ होऊन हेच प्रमाण २.९ लाख एवढे झाले असले तरी यामागे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्यामुळेच ही आकडेवारी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार २०२३ मध्ये एकट्या राज्यात ३३,६०० नव्या स्तन कॅन्सर रुग्णांची नोंद झाली. यातील बहुसंख्य रुग्ण शहरी भागातून असून मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे ही केंद्रे सर्वाधिक प्रभावित आहेत. २०१९ मध्ये ही संख्या २६,२०० होती. – म्हणजे पाच वर्षांत सुमारे 28 टक्क्यांची वाढ. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री कॅन्सर उपचार योजना’ अंतर्गत दरवर्षी हजारो महिलांना मोफत उपचार मिळतात. २०२३ मध्ये, राज्यातील १.२५ लाख महिलांनी सरकारी रुग्णालयांमध्ये मॅमोग्राफी तपासणी केली, ज्यामध्ये साडेचार हजार महिलांमध्ये संशयित गाठ आढळली. लवकर निदानामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात १७,३०० स्तन कॅन्सर रुग्णांनी उपचार पूर्ण करून सर्व्हायव्हर म्हणून नोंद केली.
स्तनाचा कर्करोग आता तरुणींमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत असून चाळीशीच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान वाढत असल्याचे निर्दशनात आले आहे. या आजारामुळे २०४० पर्यंत दरवर्षी एक लाखांहून महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. ‘लॅन्सेट’मधून ही बाबसमोर आली असून अहवालात म्हटले की २०१६ ते २०२२ याकाळात जगभरात सुमारे ७८ लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले तर सुमारे ६,८५,००० महिलांचा या आजाराने मृत्यू झाला. भारतात तरुण महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण गेल्या दोन दशकात वाढताना दिसत असून नियमित तपासणी केल्यास याला अटकाव करता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २०२० मध्ये २३ लाख इतके होते ते वाढून २०४० पर्यंत ३० लाखांपर्यंत जाण्याचा इशारा लॅन्सेट अहवालात दिला असून स्तनाच्या कर्करोगामुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडेही यात लक्ष वेधण्यात आले आहे.पाश्चिमात्या देशांपेक्षा आशियाई देशात तसेच भारतात स्तानाच्या कर्करुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असून आशिया खंडात ४० वर्षांखालील महिलांमध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके असून युरोप व अमेरिकेत हेच प्रमाण दोन ते तीन टक्के असल्याचे हिंदुजा रुग्णालय व रहेजा रुग्णालयातील विख्यात कॅन्सरशल्यचिकित्सक डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, सिगारेट व अल्कोहोलचे सेवन, जीवनशैलीतील बदल तसेच हार्मोनल असमतोलता व अनुवांशिकता ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे डॉ. दुधाट म्हणाले. आशियाई देशांत, प्रामुख्याने भारतामध्ये हा कर्करोग तरुण स्त्रियांमध्ये (२५ ते ४५ वर्षे) होण्याचे प्रमाण मागील दोन दशकांपासून सतत वाढत आहे, ही खरी चिंतेची बाब आहे. आपल्या देशामध्ये स्तनाचा कर्करोग हा महिलांमधील एक सर्वाधिक आढळणारा आजार ठरु पाहत आहे. महिलांमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२ टक्के आहे. ‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार आपल्या देशात २०२० साली १,७८,००० नवीन स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली. तरुण स्त्रियांमध्ये वाढत्या कर्करोगाशी मुकाबला करताना, आपण जास्त धोका असलेल्या तसेच अनुवंशिकता असलेल्या महिलांना शोधणे व त्यांचे जेनेटिक कौन्सिलिंग करणे गरजेचे असल्याचे डॉ दुधाट म्हणाले. सकस आहार, व्यायाम, योगा व मनन चिंतन, चांगली जीवनशैली अंगीकारा म्हणजे आपले शरीर व मन निरोगी राहण्यास मदत होईल. स्तनाच्या कर्करोगाचे अगदी लवकर निदान झाल्यास रुग्ण पूर्णत: बरे होतात व त्यापासून होणा-या मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असेही डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले. स्त्रांयांनी प्रामुख्याने लठ्ठपणावर (ओबेसिटी) जास्त लक्ष देऊन वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉ दुधाट यांनी आवर्जून सांगितले.
स्तनाच्या कर्करोगाची कारणाध्ये वाढत्या वयात होणारे लग्न, लहान वयात मासिक पाळी येणे (बारा वर्षा आधीपासून), वयाच्या पन्नाशी नंतर मासिक पाळी बंद होणे, दीर्घकाळाने मूल होणे (तीस ते पस्तीशी नंतर), अविवाहीत किंवा अपत्यहीन स्त्रियांमध्ये धोका जास्त, स्थूलपणा, आहारात अतिस्निग्ध पदार्थांचा वापर, धूम्रपान आणि अति-मद्य सेवन. स्तनाच्या कर्करोगांमध्ये अनुवंशिकता हे एक महत्वाचे कारण आहे. स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, वेदनारहित गाठ, स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनावर जास्त लाली येणे, स्तनामध्ये काही ठिकाणी जाडपणा येणे आदी असून अनुवंशिक कारणामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. जवळच्या रक्ताच्या नातेवाईकामध्ये (अनुवंशिकता) जर हा आजार असेल तर त्या कुटूंबातील इतर स्त्रियांना याचा धोका जास्त वाढतो असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता व हिंदुजाचे संचालक डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. वेळेत लक्ष दिल्यास हा आजार बरे होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी स्वपरीक्षा करणे, फॅमिली हिस्ट्री असल्यास नियमित तपासणी करणे,तसेच चाळीशीनंतर प्रत्येक महिलेने नियमित तपासणी केली व पहिल्या टप्प्यात हा आजार लक्षात आल्यास ९० रुग्ण बरे होऊ शकतात असेही डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.
पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांमध्ये टाटा मेमोरियल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून मिळालेल्या रिपोर्टनुसार, स्तन कॅन्सरचे निदान प्रथम व द्वितीय स्टेजमध्ये होण्याचं प्रमाण २०२३ मध्ये ४२ टक्के पर्यंत पोहोचलं आहे, जे २०१५ मध्ये केवळ २३ टक्के होत. यामागे मोफत मॅमोग्राफी शिबिरे, “पिंक ऑक्टोबर” मोहिमा, आणि महिला आरोग्य स्वयंसेवकांची भुमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आरोग्य विभागाच्या ‘संपूर्ण महिला आरोग्य अभियान’ अंतर्गत २०२२-२३ मध्ये ९.५ लाख महिलांची तपासणी झाली, त्यापैकी २६,००० महिलांमध्ये गाठ किंवा शंका आढळून तपासणीसाठी पुढील प्रक्रिया करण्यात आली. कॅन्सर वर मात करून समाजात पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहणाऱ्या महिलांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. टाटा मेमोरियलच्या २०२३ च्या सर्व्हायव्हर डेटानुसार, महाराष्ट्रातील स्तन कॅन्सर सर्व्हायव्हल रेट सध्या ५५ टक्केच्या जवळपास आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडं जास्त आहे. कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे, हा आजार वेळेत पकडल्यास बरा होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे ती जागरूकतेची. या दिवसाच्या निमित्ताने समाजाने एकत्र येऊन “लवकर निदान, लवकर उपचार” हे सूत्र रुजवायला हवे – हाच स्तन कॅन्सरविरोधातील खरा लढा ठरेल.
तरुण स्त्रियांमध्ये जनुकांमधील बदलामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. ट्रिपल निगेटीव्ह स्तनाच्या कर्करोगामध्ये अशी शक्यता जास्त असते. अशा कुटूंबामध्ये जेनेटिक कौन्सेलिंगची अत्यंत गरज असते. अशा जास्त धोका असणा-या स्त्रियांची योग्य पध्दतीने तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी मॅमोग्राफी, एमआरआय मॅमोग्राफी करणे आवश्यक ठरते. ४० हून कमी वयाच्या या महिलांमध्ये मॅमोग्राफी चाचणीत स्तनाच्या घनतेमुळे निदान करणे कठीण जाते. या स्त्रियांसाठी ब्रेस्ट सोनोग्राफी व एम.आर.आय. मॅमोग्राफीची मदत घेतली जाते. स्तनाची स्वपरिक्षा ही सुध्दा स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी अत्यंत महत्वा असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. वेळीच हा आजार लक्षात आल्यास अनेक चांगल्या प्रकारचे इलाज या रोगावर आहेत. यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, टारगेटेड थेरपी, इम्युनो थेरपी, रेडिएशन थेरपी व हॉर्मोनल थेरपी. शस्त्रक्रियामध्ये, स्तन संपूर्ण काढणे अथवा मर्यादित शस्त्रक्रिया करून स्तन वाचविला जातो. अनुवाशिंक आजार असलेल्यांनी तीशीनंतर तसेच अन्य महिलांनी चाळीशीत नियमित तपासणी करणे आवश्यक असून वेळीच निदान झाल्यास मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊ शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर एन्.एच. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने दक्षिण आशियातील पहिले आणि सर्वात वेगवान जिनियस एजीआय ३डी मॅमोग्राफी सिस्टिम सुरू करून महिलांच्या आरोग्य सेवेत एक मोठी झेप घेतली आहे. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने ही प्रणाली ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीत क्रांती घडवते आहे. टॉमोसिन्थेसिसच्या सहाय्याने केवळ ३.७ सेकंदात चाचणी पूर्ण होते. ही प्रणाली आजच्या घडीला आरोग्य तंत्रज्ञानातली सर्वात वेगवान पद्धत आहे. या तंत्रज्ञानामुळे महिलांना अधिक आरामदायक तपासणीचा अनुभव मिळतो आणि निदानाची अचूकता आणि वेग प्रचंड वाढतो. भारतामध्ये स्तन कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. एकूण महिलांमधील कॅन्सरपैकी २६ टक्के केवळ स्तन कर्करोग रुग्ण आहेत. दरवर्षी १.९ लाखांहून अधिक भारतीय महिलांनास्तन कर्करोगाचे निदान होते, आणि यापैकी अनेकांना उशिरा म्हणजे आजाराचे पुढचे टप्पे गाठल्यावरच निदान होते. कारण तपासणीचा अभाव किंवा उशीराने डॉक्टरांकडे जाणे.
ही प्रणाली नाजूक तपासणीसाठी अचूक, आरामदायक आणि समावेशक अनुभव देण्यासाठी महिलांच्या सोयीस अनुकूल अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. ही सिस्टिम कॉन्ट्रास्ट-एन्हान्स्ड स्पेक्ट्रल मॅमोग्राफी आणि व्हॅक्युम-असिस्टेड बायोप्सीलाही सपोर्ट करते, त्यामुळे निदान अधिक प्रभावी व पुन्हा तपासणीची गरज कमी होते. “ही मॅमोग्राफी सिस्टिम म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर लवकर ओळखण्यात आणि अचूक निदान करण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उच्च गती आणि सखोल ३ डी इमेजिंगमुळे इनवेसिव्ह कॅन्सर लवकर आणि अचूकपणे ओळखता येतो. शिवाय, तपासणी प्रक्रियाही अधिक आरामदायक होते. हे महिलांच्या आरोग्यसेवेत मोठा बदल घडवणारे आहे,असे डॉ. अशुतोष कोठारी, संचालक ब्रेस्ट कॅन्सर, ऑन्कोप्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, सर एन्.एच. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांनी सांगितले.