मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पहिल्यावहिल्या पंचतारांकित गृहप्रकल्पातील घरांसाठीच्या ३३२ विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा अखेर संपली. उच्च आणि मध्यम गटासाठीतील ३३२ घरांचा समावेश असलेल्या ३५ मजली इमारतीला अखेर बुधवारी म्हाडाकडून निवासी दाखला (ओसी) प्राप्त झाला. निवासी दाखला प्राप्त झाल्याने घरांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांतच ३३२ विजेत्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
पहाडी गोरेगाव येथील भूखंड अ आणि ब येथे एकूण सात हजार ५०० घरे बांधण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. त्यानुसार ३०१५ घरांच्या बांधकामाला सुरुवात करून त्यापैकी अत्यल्प गटातील १९४७ घरांची सोडत २०२३ मध्ये काढून या घरांचा ताबा दिला. तर मंडळाच्या या ३०१५ घरांमध्ये उच्च आणि मध्यम गटातील ३३२ घरांचाही समावेश होता आणि मागील काही वर्षांपासून या घरांचे काम सुरू होते. या घरांसाठी निर्माणाधीन प्रकल्पाअंतर्गत २०२४ मध्येच सोडत काढण्यात आली होती. सोडत काढण्यात आलेल्या घरांचा हा प्रकल्प म्हाडाचा पहिलावहिला पंचतारांकित प्रकल्प आहे. मुंबईतील म्हाडाची ही सर्वाधिक उंच, ३५ मजल्यांची इमारत आहेच, मात्र या प्रकल्पात पहिल्यांदाच म्हाडाकडून जलतरण तलाव, व्यायामशाळा, योगा केंद्र, पोडीयम वाहनतळ, क्लब हाऊस अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या घरांच्या सोडतीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, सोडत काढतानाच मुंबई मंडळाने या घरांचा ताबा जून २०२५ पर्यंत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अखेर आता या घरांचा समावेश असलेल्या ३५ मजली इमारतीला बुधवारी म्हाडा प्राधिकरणाकडून निवासी दाखला (ओसी) देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्याने दिली.
पहाडीतील ३५ मजली इमारतीत १०५ घरे उच्च गटातील असून २२८ घरे मध्यम गटासाठी आहेत. तर १०५ घरांचे क्षेत्रफळ ९८९.५८ चौरस फूट, तर २२७ घरांचे क्षेत्रफळ ७९४.३१ चौरस फूट आहे. उच्च गटातील घरे ३ बीएचके, तर मध्यम गटातील घरे २ बीएचके आहेत. उच्च गटातील घरांची विक्री मुंबई मंडळाकडून १ कोटी ३३ लाख ७७ हजार ५५८ रुपयांना, तर मध्यम गटातील घरांची विक्री १ कोटी ९ लाख ते १ कोटी ११ लाखा रुपयांना करण्यात आली आहे. या घरांचा ताबा मिळण्याची ३३२ विजेत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या घरांना निवासी दाखला मिळाल्याने आता मुंबई मंडळाच्या पणन विभागाकडून घरांचा ताबा देण्यास सुरुवात केला जाणार आहे. त्यामुळे विजेत्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे.