मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचले. पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाली. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मशीद, भायखळा, शीवदरम्यान रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. दिवसभरातील विविध कारणामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली. तर, मंगळवारी पाऊस नसतानाही लोकल सेवा विलंबाने धावत होती. परिणामी, सलग दोन दिवस प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला.

मशीद स्थानकाजवळ सोमवारी पाणी साचल्याने सीएसएमटी – वडाळा दरम्यान लोकल सेवा एक तास बंद करण्यात आली होती. तसेच भायखळा, कुर्लादरम्यान पाणी साचल्याने भायखळा, दादर, परळ, कुर्लापर्यंत लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात आली होती. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या संपूर्ण दिवसभराच्या वेळापत्रकावर झाला. मध्य रेल्वेला लोकल वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी तारेवरची करावी लागली. परंतु, बिघडलेल्या वेळापत्रकामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर, ४०० लोकल विलंबाने धावल्या.

मुंबईत मंगळवारी पाऊस नसतानाही लोकल विलंबाने धावत होत्या. लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब झाला. दादर – सीएसएमटीदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल संथगतीने पुढे सरकत होत्या. तर, दुपारी १.२३ वाजता भायखळा रेल्वे स्थानकात दुपारी १.४५ ची लोकल येत असल्याचे फलकावर दिसत होते. त्यामुळे प्रवासी वर्गामध्ये काहीसा गोंधळ झाला होता. जोरदार पावसामुळे अनेक नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना विलंब झाला होता. दरम्यान, मंगळवारी मध्य रेल्वेच्या लोकल सुरळीत धावत होत्या. फक्त काही लोकल फेऱ्या काही मिनिटे उशिराने धावत होत्या. सुट्टीकालीन विशेष रेल्वे गाड्या मुंबई विभागात उशिरा दाखल झाल्याने या रेल्वेगाड्यांसाठी मार्ग उपलब्ध करून देताना लोकल सेवा खोळंबली होती, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.