मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता या महिनाअखेरपर्यंत मोठा पाऊस होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चार दिवसात किरकोळ पावसाच्या सरी काही भागात हजेरी लावतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तरप्रदेश, बिहारमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. महिनाअखेरपर्यंत राज्यातील काही भागात किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबई : प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती – शिंदे गटाकडून घोषणा

मुंबईसह राज्यात येत्या तीन ते चार दिवसांत मोठा पाऊस अपेक्षित नाही. एक-दोन पावसाच्या सरी हजेरी लावतील. तसेच अनेक भागात हवा ढगाळ राहील. विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

मुंबई, पालघर, ठाण्यात ३० ऑगस्टपर्यंत किरकोळ पाऊस असेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात २८ ऑगस्टपर्यंत हलका पाऊस आणि २९ आणि ३० ऑगस्टपर्यंत विजा कडाडण्याची शक्यता आहे.