मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून कुर्ला येथील नेहरू नगरमध्ये विकासकामांची भर पडत आहे. तसेच, कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत गेल्यामुळे तेथील ९०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. या निर्णयाला नागरिकांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. तसेच, प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय शासनाने मागे घेऊन संबंधित जागेवर उद्यान उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
कुर्ल्यातील नेहरू नगरमध्ये मोठ्या प्रमाणात म्हाडा इमारतीचा पुनर्विकास झाला आहे. अद्यापही विविध बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे झाडांसाठी जागा उरलेली नाही. तसेच, विकासकामांसाठी पूर्वीच अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. त्यामुळे या भागात हिरवळ निर्माण व्हावी, यासाठी येथील नागरिक प्रयत्न करीत आहेत. त्यातच बीकेसी प्रकल्पाला दिलेली मदर डेअरीची जागा आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी परिसरातील ९०० झाडे कापण्याचे प्रस्तावित असून या वृक्षतोडीला नागरिकांकडून विरोधात होत आहे. संबंधित जागेतील झाडांचा हिरवळीचा भाग सोडल्यास सगळीकडे इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शासनाने प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मुंबईतील हवेचे प्रदूषण मर्यादेपेक्षा १० पट जास्त आहे. झाडे कमी झाल्यास हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्षतोड रोखण्यासाठी कुर्लावासियांनी लोकचळवळ देखील उभारली असून त्याद्वारे मोर्चे काढण्यात आले, आंदोलने करण्यात आली. तसेच, आता वृक्षतोडीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षतोडीचा निर्णय मागे घेण्याबाबत लोकचळवळ फाऊंडेशनचे संस्थापक किरण पैलवान लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
गेल्या दीड वर्षापासून परिसरात उद्यान उभारण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्यापही मागणी मान्य झालेली नाही. झाडे आणि शहर एकत्र वाढू शकतात, हे सिंगापूर शहरांने दाखवून दिले आहे. हरितक्षेत्राशिवाय विकास म्हणजे पुढच्या पिढ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्यासारखे आहे, असे लोकचळवळ फाऊंडेशनचे संस्थापक किरण पैलवान यांनी सांगितले.