मुंबई : राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका गुरूवारी त्यांच्या डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. य परीक्षेला राज्यभरातून यंदा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका २०२५ डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अपार आयडी हे राज्य मंडळाकडे अचूक नोंदवलेले आहेत. त्यांच्या गुणपत्रिका अपार आयडीसोबत डिजिलॉकर अकाऊंटमध्ये उपलब्ध मिळू शकतील. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांकडे अपार आयडी नाही किंवा त्यांनी राज्य मंडळाकडे त्यांचे अपार आयडी नोंदविलेले नाही. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचे वर्ष आणि बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका डिजिलॉकर ॲपमध्ये उपलब्ध करुन घेता येतील.
सर्व विभागीय मंडळांनी संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची आवश्यक ती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.
विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.