मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. करोनामुळे २ वर्षे नाटक, चित्रपट बंद होते. आता फुकटात करमणूक मिळत असेल, तर का नको? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. ते आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ करणारे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.”

“आता फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?”

“दोन वर्षांचा कालखंड प्रचंड मोठा आहे. त्या कालखंडात सर्व बंद होतं. नाटक, थिएटर, सिनेमा सगळं बंद होतं. त्यामुळे आता फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?” असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला.

“तीन पक्षांच्या सरकारने अर्धा कालखंड पूर्ण केला याचं विरोधकांना आश्चर्य”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “पूर्वी महाराष्ट्रात दोन पक्ष विरुद्ध दोन अशी स्थिती होती, आता तीन पक्षांविरोधात एक पक्ष अशी स्थिती आहे. आधी लोकांना आम्ही तीन पक्ष आलो त्याचं आश्चर्य वाटलं, आता तीन पक्षांच्या सरकारने अर्धा कालखंड पूर्ण केला याचं विरोधकांना आश्चर्य वाटतंय, तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने मजबुतीने सरकार चालवलं. हे एकएक आश्चर्याचे धक्के विरोधकांना बसत आहेत.”

हेही वाचा : “राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत”, भाजपाची ‘ढ’ टीम म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“निवडणुकीनंतरही विरोधकांना धक्के बसत राहतील”

“या पंचवार्षिकमध्येच नाही, तर पुढील निवडणुकीनंतरही विरोधकांना हे धक्के बसत राहतील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही, मित्र म्हणायचं आणि पाठीत वार करायचा असा विचार कोणाच्या मनात येत नाही तोपर्यंत आम्ही देखील २०-२५ वर्षे भाजपासोबत राहिलोच होतो. आम्ही वेगवेगळे चटके-फटके तेव्हाही खाल्ले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“…मग भोंगाबंदी देशभर करा ना”

सध्या जो ताजा मुद्दा निर्माण झाला आहे, गाजला आहे, गाजवला गेला आहे तो म्हणजे भोंग्याचा या लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मला तरी तो गाजलेला मुद्दा वाटत नाही. कारण, मी तुम्हाला परत एकदा सांगतो भोंग्याचा विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा देशासाठी आहे. त्यासाठी मागील आठवड्यात गृहमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि त्यात असंच ठरलं की, हा निर्णय…जसं नोटाबंदी देशभर केलीत ना?, लॉकडाउन देशभर केला ना? मग भोंगाबंदी देशभर करा ना. कारण, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यामध्ये आपले केंद्र सरकार ही एक पार्टी होती, केंद्र सरकारने तो आदेश काढला पाहिजे. त्यामध्ये देखील तो जर का निकाल तुम्ही नीट वाचला, तर तो सर्वधर्मीयांना आणि सर्वांना तो लागू आहे. त्यामुळे नुसते एखादे भोंगे काढा असं नाही, मग आपल्याला सर्व धर्मीयांना ते पाळावं लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण मला तो मुद्दा आता गौण वाटतोय, कारण माझ्यासमोर प्रश्न आहे तो म्हणजे राज्याला पुढे न्यायचं आहे, गुंतवणूक वाढवायची आहे. थांबलेलं अर्थचक्र हे परत फिरवायचं आहे, हे मोठं आव्हान आहे.” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.