मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर आता देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु करण्यात आले आहे. मुंबईत येत्या १८ फेब्रुवारीपासून प्रत्येक प्रभागात हे अभियान राबिवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अनिश्चित असले तरी, त्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे.
काँग्रेस अंतर्गत कलह मिटविण्यासाठी पक्षाचे राज्याचे प्रभारी पाटील रविवारी मुंबईत आले होते. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिलेल्या ‘हात से हात जोडो’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईत येत्या १८ फेब्रुवारीपासून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. त्याची तयारी सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. काँग्रेसनेही भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून मुंबई पिंजून काढण्याचे ठरविले आहे.