लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून (ठाकरे) स्वबळाचा सूर आळवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून नमती भूमिका घेण्यात येत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याबाबत पुनर्विचार करतील. महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडुकीला सामोरे जावे, असे आपल्याला वाटत असल्याचे काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

‘इंडिया’ आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो. आजच्या स्थितीवरून त्यांना स्वतंत्र लढावे वाटत असेल तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र महापालिकेमध्ये आघाडी व्हावी, असे आम्हाला वाटते. त्यांना स्वतंत्र लढायचे असेल तर आम्हीसुद्धा स्वतंत्र लढण्याची तयारी करू, असे वडेट्टीवार म्हणाले. प्रत्येक महापालिकेत आघाडी होईल, असे मानण्याचे काही कारण नाही. प्रत्येक ठिकाणी असलेली परिस्थिती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत लक्षात घेऊन त्या-त्या ठिकाणी निर्णय व्हावा, असे सर्व काँग्रेस नेत्यांचे मत असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा रस्ते धुण्याचा प्रयोग, शंभर टँकर तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सत्ताधाऱ्यांचे गुन्हेगारांना संरक्षण’

विजय वडेट्टीवार यांनी बीड आणि परभणी येथील घटनांवरही भाष्य केले. सरकार जर गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहत असेल तर त्यांची हिंमत वाढणार. मस्साजोग घटनेचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत गेले आहेत. बीड जिल्हा महाराष्ट्रातील बिहार असल्याचे एका ‘आयपीएस’ अधिकाऱ्याने म्हटल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. मस्साजोग असो किंवा परभणी, पोलीस ज्या पद्धतीने वागले त्यावर पांघरूण घालण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करीत आहेत. सत्ताधारी मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर मात्र या घटना वाढत जातील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.