आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
महागाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेला दिलेले कोणतेही वचन काँग्रेसने पाळलेले नाही. काँग्रेसचा वचनपूर्वी मेळावा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल दिली नाही तर भिमसैनिक बलिदान देतील, असा इशारा रिपाईने दिला होता. इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी गेले वर्षभर आंबेडकरी जनतेने रिपाईच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला. आता त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता भारनियमनामुळे त्रस्त आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, दिलित-आदिवासींवरील अत्याचार सरकार रोखू शकलेले नाही. स्वयंपाकाच्या गॅसपासून पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून सरकारने जनतेला वेठीस धरले आहे. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता काँग्रेस वचनपूर्तीचा देखावा करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress should not try to take credit of indu mill
First published on: 29-12-2012 at 06:40 IST