मुंबई : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. परंतु आपण न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात माफीनामा सादर केला. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची हमी दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना मलिक यांनी न्यायालयाची माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सादर केले व यापुढे वानखेडे कुटुबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची हमीही पुन्हा दिली.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यातील अंतरिम दिलासा मिळवण्याबाबत एकल न्यायमूर्ती पीठासमोर सुनावणी पूर्ण होऊन आदेश दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतीही विधाने करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र या हमीनंतरही आपल्या कुटुंबीयांविरोधातील मलिक यांची वक्तव्ये सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांच्यातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन मलिक यांनी दिलेल्या हमीचे हेतुत: उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवले होते. तसेच तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मलिक यांच्यावतीने अ‍ॅड्. आस्पी चिनॉय यांनी चार पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञाद्वारे मलिक यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाने त्यांची ही माफी मान्य केली.

नेमके काय म्हटले?

आपण केवळ आपल्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. वानखेडे यांच्याविषयी कोणतीही वैयक्तिक वक्तव्ये केलेली नाहीत. असे असली तरी याआधी केलेल्या वक्तव्यांविषयी आपण खेद व्यक्त करतो. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आपण न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो. शिवाय न्यायालयात दिलेल्या हमीनंतर वानखेडे कुटुंबीयांबाबत केलेली वक्तव्ये ही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधील आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ही वक्तव्ये केली होती. त्याने न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन होत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नसल्याचा आपला समज होता. मात्र अशा प्रकारच्या विधानाने न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन होत असल्याचे आपल्याला समजावण्यात आल्याने यापुढे वानखडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची हमी देतो, असे मलिक यांनी सांगितले.