मुंबई : भारतात केरळ, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. आता चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथे प्रवास करणे टाळा, असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. जर प्रवास करणे अटळ असेल, तर मुखपट्टी, सामाजिक अंतर आणि वारंवार हातांची स्वच्छता या शिफारशींचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात येत आहे.
करोनाच्या जेएन.१ या प्रकाराच्या एनबी.१.८.१ या उपप्रकाराचा सध्या वेगाने प्रसार होत आहे. चीनसह आशियातील देशांमध्ये त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेऊन करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या देशांमध्ये प्रवास करणे टाळावे, असा सल्ला पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. प्रामुख्याने चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.
राज्यात ६५ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
राज्यामध्ये रविवारी ६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. तसेच रविवारी राज्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आठवर पोहचली आहे. नव्या ६५ रुग्णांमध्ये मुंबई २२, पुणे महानगरपालिका २५, ठाणे महानगरपालिका ९, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ६, कोल्हापूर महानगरपालिका २ आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये १ रुग्ण सापडला आहे.
शिफारशी
●चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर परिस्थिती स्थिर होईपर्यंत प्रवास पुढे ढकला.
●प्रवास करणे गरजेचे असल्यास मुखपट्टी, सामाजिक अंतर आणि वारंवार हातांची स्वच्छता यांसह सर्व आरोग्य उपायांचे पालन करा.