Mumbai Kabutarkhana Controversy: मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या बैठकीत राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र, यानंतरही आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही आंदोलकांनी आतमध्ये शिरून राडा घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर सोबत आणलेलं कबुतरांसाठीचं खाद्यदेखील त्यांनी तिथे पसरवून टाकलं.
कबुतरखान्यावर आंदोलकांची तोडफोड
दरम्यान, कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री आंदोलकांनी काढल्यानंतर तिथे झाकण्यासाठी केलेलं लाकडी बांबूंचं बांधकामदेखील आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी वारंवार सांगितल्यानंतरदेखील आंदोलकांनी कबुतरखान्याजवळ तोडफोड करत आतमध्ये प्रवेश केला.
कबुतरखान्याचं आंदोलन स्थगित झालंच नव्हतं?
दरम्यान, दादरला जमलेल्या आंदोलकांनी कबुतरखान्यांसाठीचं आंदोलन कधी स्थगित झालंच नव्हतं, असा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारच्या पुढील कार्यवाहीसाठी हे आंदोलन स्थगित झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, असं काहीही झालेलं नसून अशी अफवा राजकीय हेतूने पसरवण्यात आल्याचा दावा काही आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत हे कबूतर उपाशी मरणार का? असा सवालही आंदोलकांकडून करण्यात आला.
कबुतरांच्या प्रश्नावर अजित पवारांची भूमिका
“देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला मंगलप्रभात लोढाही होते. दादर कबुतरखान्याशी संबंधित एक संघटना आहे. त्या संघटनेचेही सदस्य होते. यातून मार्ग निघावा अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्यात घेतली होती. त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनाही बोलवून घेतलं होतं. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गगराणींनाही काही सूचना दिल्या. या कबुतरांचं एकदमच खाणं बंद करणं चुकीचं ठरेल या अनुषंगाने संजय गांधी उद्यान व इतर बिगर रहिवासी मोकळ्या जागी त्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यासंदर्भात विचार मांडण्यात आला होता”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादरमधील आंदोलनाबाबत बोलताना दिली.
कबुतर काही आज मुंबईत आलेले नाहीत, आधीपासून होते – अजित पवार
“हा पशूपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. यात राजकारण आणण्याचं कारण नाही. पक्ष्यांवर प्रेम दाखवणं ही आपली परंपरा आहे. पण त्यातून काही आजार उद्भवू नये हेही खरं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की कबुतरांमुळे खरंच आजार होतात का? यावरही संशोधन करा. जसं सुरुवातीच्या काळात करोना आला तेव्हा सगळ्याच गोष्टी करोनामुळे होत नव्हते. काहींना इतर आजारही होते. पण काही घडलं तर करोनामुळे मृत्यू झाला असं बोललं जायचं. मोठ्या रुग्णालयांकडून यावर मतं घ्यावी लागतील. कारण कबुतर काही आज मुंबईत आलेले नाहीत. पूर्वीपासून मुंबईत कबुतर होते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही”
“जसं नागरिकांना राहण्या-खाण्याचा अधिकार आहे, तसाच पशू-पक्ष्यांना त्यांच्यासाठीच्या भागात राहण्याचा-जगण्याचा अधिकार निसर्गानं दिला आहे. जैन समाज व इतर व्यक्तींच्या भावना कालच्या बैठकीत काहीशा तीव्र होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या परिसरात मोठ्या संख्येनं कबुतरखाने आहेत. पण काहींचं असं म्हणणं आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात. शेवटी न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. यात सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे सगळ्यांना समजावून सांगितलं”, असंही अजित पवार माध्यमांना म्हणाले.
मुंबई महानगर पालिकेनं कारवाई का केली?
“काही संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकल्यामुळे तिथे कबुतर मरत आहेत. त्यांना खायला मिळत नाहीये. वर्षानुवर्षे त्या कबुतरांना तिथे जाऊन खाण्याची सवय लागली होती. अनेकजण तिथे कबुतरांना खाद्य देत होते. पण न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला सक्त आदेश दिल्यानंतर पालिकेने तशी कारवाई केली”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
दादरच्या राड्याबाबत काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
“जे काही झालं ते चुकीचं झालं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचं ऐकून योग्य निर्देश दिले होते. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. ते सर्व विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य आदेश दिले होते. पण आज सकाळी जे काही झालं ते चुकीचं होतं. त्यामुळे मी इथे आलो. आंदोलकांना मी भेटणार आहे. माझी त्यांना विनंती आहे की शांतता राखा. कायदा हातात घेऊ नका. सरकारचं याकडे लक्ष आहे. उद्या न्यायालयात सुनावणी आहे. तिथे काय निर्णय होतोय ते आपण बघू. तोपर्यंत शांतता राखा”, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दादर कबुतरखान्याजवळील राड्यावर बोलताना दिली.
“मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर निर्देश दिले आहेत. लोकांचं आरोग्यही राखायला हवं आणि कबुतरही मरायला नकोत असा मध्यममार्ग काढावा लागेल. यासंदर्भात योग्य अशी योजना तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत”, असंही मंगलप्रभात लोढा म्हणाले.