सीआयडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना समन्स बजावलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सीआयडीने त्यांना २ प्रकरणात दोन वेगवेगळ्या दिवशी हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं आहे. एक समन्स मरीन ड्राईव्ह येथे श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आहे, तर दुसरा ठाण्यातील खंडणी प्रकरणी आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चौकशी होणार आहे.

परमबीर सिंह यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन समन्स पाठवण्यात आलीत. त्यापैकी मरीन ड्राईव्हला दाखल गुन्ह्याप्रकरणी सोमवारी (२९ नोव्हेंबर) चौकशी होईल, तर ठाण्यातील खंडणी प्रकरणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सीआयडी चौकशी करेल. एकूणच आता परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सीआयडीने याआधी एका अट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास करताना परमबीर सिंह यांचा चंदीगडला जाऊन जबाब नोंदवला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित

दरम्यान, मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं होतं.

याआधी मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं होतं. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे.

हेही वाचा : परमबीर सिंह यांच्यावर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात…!

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.