मुंबई : सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वमानानुसार, मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. काही तासांतच अनेक ठिकाणी पाणी साचले. मुंबई शहर आणि पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस कोसळला.
दरम्यान, मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे, तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभगाने केले आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मंगळवारी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार सायंकाळनंतर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबई शहरात विजांसह हलक्या सरी बरसल्या. अंधेरी जोगेश्वरी परिसरात एका तासात ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. अगदी पहिल्याच पावसाने परिसराची दैना केली.
अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे भुयारी मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला. त्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घाटकोपर, विक्रोळी , बोरिवली, कांदिवली तसेच विरार परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे. मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा प्रभाव राहील. त्यामुळे बुधवारपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या कालावधीत काही भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस पडणारा पाऊस हा वळिवाचा पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी ७ ते ८ वाजता पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रावर झालेली नोंद
जोगेश्वरी – ६३ मिमी (सर्वाधिक)
मालपा डोंगरी महापालिका शाळा – ५७ मिमी
मरोळ अग्निशमन केंद्र – २९ मिमी
जुहू – २४ मिमी
सांताक्रूझ – २३ मिमी
विलेपार्ले अग्निशमन केंद्र – २१ मिमी
खार दांडा – १९ मिमी
दिंडोशी – १८ मिमी
पूर्व उपनगर
पवई – ३८ मिमी
भांडूप – २९ मिमी
विक्रोळी – १८ मिमी
मुलुंड मिठागर महापालिका शाळा – १८ मिमी
———————-
नवी मुंबईतही विजांसह मुसळधार पाऊस
नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला.
——————-
गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर
वादळी वारे, विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम
वादळी वारे, विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
महाराष्ट्र किनाऱ्यापासून ७५ किमी बुधवारपासून ते रविवारपर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर आणि त्याच्या बाहेर ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळेपुढील पाच दिवस मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात वादळ, गारपीटीमुळे पीकहानी खानदेशात वादळी पाऊस तसेच गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून जळगाव, धुळे भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाजरी, केळी, कांदा आणि मका या पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे फळपिके काढण्यास विलंब होत आहे.